MVA News : शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही; थोरातांनी सांगितलं कारण..
Maharashtra Politics : महाविकास आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या सभांच्या रणनितीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकार उद्या टिकेल का नाही, याबाबत शंका उपस्थित केली. त्याचे कारणही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जनतेने विधानपरिषद आणि पोटनिवडणुकीत दाखवून दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास वाढवून काम करण्याचेही आवाहनही थोरात यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने (MVA) कोरोना काळात चांगले काम केल्याचे थोरांतांनी (Balasaheb Thorat) सांगितले. ते म्हणाले, "महाविकास आघीडीचे सरकार आले त्यावेळी कोरोनाने जगात धुमाकूळ घातला होता. कोरोना काळात देशात सर्वोत्तम काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने केले आहे. या कामाची दखल जगभरातून घेतली गेली. आम्ही मंत्री होतो. कुठेही आकड्यांची लपवाछपवी केली नाही. कोरोनांच्या संकटातही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. २०१४ च्या फडणवीस सरकारने ६५ रकाने भरून घेत शेतकऱ्यांचा छळ केला. आम्ही फक्त ओळख पटविण्याचे काम केले. कोकणात दोनवेळा चक्रीवादळ आले. वादळांनंतर दोन तासातच रस्ते खुले केले. वीज पूर्ववत केली."
थोरातांनी पुढे सध्या जनतेच्या मनात वेगळे वारे वाहत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "सात-आठ महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार दुर्देवाने कोसळले. त्यानंतर विधानपरिषद, पोटननिवडणुका आघाडीने जिंकल्या. चिंचवडला मतांचे विभाजन झाले. याचा अर्थ जनमतामध्ये वेगळे वारे वाहत आहे. ग्रामीण भागात भाजप कुठेही नाही. तेथे सर्वात जास्त काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पहायला मिळते. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेलाही राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मधल्या एका स्वतंत्र सर्व्हेक्षणात ३४ लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या असतील असे भाकित वर्तविले. आपल्या सर्व्हेक्षणात त्या जागा ३८ झाल्या आहेत. जनतेला पुन्हा आपलंच सरकार हवे आहे."
यानंतर थोरातांनी Balasaheb Thorat अर्थसंकल्पावरून सरकारचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यामुळे हे सरकार टिकेल का नाही हे सांगता येत नाही,अशी शंका उपस्थित केली. ते म्हणाले, "सरकार टिकणार असा आत्मविश्वास असतो त्यावेळी अर्थसंकल्प प्रॅक्टीकल असतो. या अर्थसंकल्पात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. हे बजेट म्हणजे त्यांचा जाहीरनामा असल्याचीच प्रचिती येत आहे. त्यामुळे उद्या हे सरकारचे टिकेल का नाही याची शाश्वती कमी आहे. उद्या सरकार गेले तर अर्थसंकल्प हाच आपला जाहीरनामा म्हणून सांगायला ते मोकळे होतील. आता आपला आत्मविश्वास जागा करा आणि पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.