फडणवीस बोलले म्हणजेच अजितदादा बोलले : सदाभाऊ खोत यांचा जावई शोध
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. देहू येथील शिळा मंदिराचे लोकार्पण, मुंबईमधील राजभवानातील 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन, मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानंतर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव अशा मान्यवरांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला.
मात्र मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रमांमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबतीत राज शिष्टाचाराचे पालन न केल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी लोहगाव विमानतळावर स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनी पवार यांच्या खांद्यावर हात ठेवतं त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मात्र त्यानंतर पवार यांच्याबाबतीत राजशिष्टाचाराचा दोनवेळा भंग झाल्याचे निदर्शनास आले.
देहू येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पवार यांनी भाषण करणे अपेक्षित होते. मात्र सुत्रसंचालकांनी थेट पंतप्रधान मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने पवार यांना भाषणासाठी परवानगी दिली नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचा अपमान झाला असून हा महाराष्ट्राचाही अपमान असल्याचे म्हटले. याशिवाय मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातही अजित पवार यांना व्यासपीठावर बसायला खुर्चीच नसल्याचे दिसले. त्यानंतर कॅबिनमध्ये दुसऱ्या रांगेत त्यांना स्थानापन्न व्हावे लागले.
दरम्यान या सगळ्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) किती खालच्या पातळीचे राजकारण करू शकतात, हे आजच्या नरेंद्र मोदी यांच्या देहूच्या दौऱ्यावरून दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. याला प्रत्यूत्तर देताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, अमोलजी, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत. तो आठवावा शपथविधी....! असे म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.