पुणे : राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यानुसार महाविकास आघाडीचे मंत्री आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. महाडिक माघार घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेकडून (Shivsena) कोणत्याही परिस्थितीत सहाव्या जागेवर आमचाच उमेदवार निवडून येणार, असा दावा छातीठोकपणे केला जात होता. मात्र, कालपासून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. (Rajyasabha Election 2022)
येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत चार जागांवर भाजपचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, भाजप पाचव्या जागेवरही उमेदवार रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसमोर कोणता प्रस्ताव ठेवतात का, हेदेखील पाहावे लागणार आहे.
भाजपकडून आज पीयूष गोयल अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.
एक खासदार निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज असते. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची शिल्लक मते शिवसेनेला मिळणार आहेत. पण यात किंगमेकर ठरणार आहेत ते अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार. त्यामुळे ठाकरे सरकार फडणवीसांवर भारी पडतात की फडणवीस शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करणार, हे आता राज्यातले २९ आमदारच ठरवणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.