मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नबाव मलिक (Nawab Malik) तुरुंगात पडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सोमवारी विशेष न्यायालयात दिली. मलिक तीन दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना जामीन द्यावा, अशी मागणीही वकिलांनी न्यायालयात केली आहे. दरम्यान, आता पाच मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (Nawab Malik Latest Marathi News)
ईडीने (ED) मलिकांना मनी लाँर्डिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. तेव्हापासून ते कोठडीमध्येच आहेत. मलिकांनी प्रकृतीचे कारण देत विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. जामीनावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी त्यांचे वकिल कौशल मोर यांनी मलिकांना खासगी रुग्णालयात भरती दाखल करण्याची परवनागी मिळावी, अशी मागणी केली. त्याला ईडीने विरोध केला. तसेच मलिकांच्या जामीनालाही ईडीच्या वकिलांनी विरोध केला आहे. जे. जे. रुग्णालयातून अहवाल आल्यानंतर त्यावर विचार करावा, असं ईडीकडून सांगण्यात आलं. तसेच रुग्णालयात दाखल केल्याची माहितीही आपल्याला देण्यात आली नाही, असे ईडीने स्पष्ट केलं.
न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाकडून मलिकांच्या प्रकृतीबाबत अहवाल मागवला आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक सुविधा आहेत का, याबाबत पाच मेपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. मलिक हे तुरुंगात पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता जे. जे. रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर मलिकांच्या जामीनावर सुनावणी होईल. मलिकांच्या वकिलाने नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. ही परवानगी मान्य करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA न्यायालयाने 22 एप्रिल रोजी मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 मेपर्यंत वाढ केली आहे. याशिवाय न्यायालयात दाखल केलेल्या 5 हजार पानी आरोपपत्रावर कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून याची प्रत आरोपीला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 22 एप्रिल रोजी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सुर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरूध्द ही याचिका होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मलिका यांची बाजू मांडली. 1993 मध्ये झालेल्या घटनेसाठी 2022 मध्ये अटक कशी केली जाऊ शकते, असा दावा सिब्बल यांनी केला. पण न्यायाधीश सुर्यकांत यांनी संबंधित न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यास सांगत आम्ही या टप्प्यावर यात ढवळाढवळ करणार नाही, असं स्पष्ट केले. त्यामुळे इथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.