
डोंबिवली : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election 2022) मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून अपक्षांच्या मनधारणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मविआ आणि भाजप अपक्षांनी आपल्याला मदत करावी म्हणून प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्यानं निवडणूक लागली आहे. (Rajyasabha Election news update)
भाजपनं राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले आहेत त्यामध्ये पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. तर, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्यापैकी सहा उमदेवार खासदार होतील, तर एका उमेदवाराचा पराभव होईल. राज्यसभा निवडणुकीचा निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांवर ठरणार आहे.
छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचेही मत मोलाचे ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाणे मधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार असा सवाल राजकीय वर्तुळात आहे.याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी 'राजसाहेब जो आदेश देतील तो,' असे बोलत सध्या अधिक बोलणे टाळले आहे.
मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप -मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत, असे असेल तरी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे दिसून आले आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला खिंडार पाडली आहे. राज्यात केडीएमसी ही एकमेव पालिका होती, जिथे दोन आकडी नगरसेवक मनसेचे होते. दरम्यान महापालिका निवडणुक जवळ आली असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपला त्या मताची आशा आहे. दरम्यान याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी राज साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. यामुळे आता राज यांच्या आदेशानुसार च सूत्र हलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते काय निर्णय घेतात हे पाहणे औतूसक्याचे ठरेल.
मनसे आमदार राजू पाटील यांनी "चिंता नसावी, आमच्यासाठी मा. श्री.राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही", असं म्हणत मनसे कुणाला पाठिंबा देणार हे राज ठाकरे ठरवतील असं म्हटलंय. त्यामुळं मनसे राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार हे १० जून रोजी स्पष्ट होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.