
शर्मिला वाळुंज
Dombivli Political News: पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्ग कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई - गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली होती.
यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर पत्रातून आपली भूमिका मांडली. यात मनसेच्या खळ्ळ खट्याक भूमिकेवर आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो...? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक...? असे म्हणत मनसेवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता आमदार राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाणांचा खरपूस समाचार घेतला आहे.
आता कल्याण डोंबिवलीचे मनसे(MNS) आमदार राजू पाटील यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. पाटील यांनी ट्विट करत गेली अनेक वर्ष सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? असा सवाल करत, जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची ही वेळच आली नसती अशी चपराक मारली आहे.
राजू पाटील(Raju Patil) म्हणाले,येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम व ह्या वर्षाअखेरीस संपूर्ण मार्गिका पूर्ण होईल ह्या आश्वासनाने थोडा दिलासा नक्कीच मिळाला. पण हा दिलासा नसून वचन असेल आणि तुम्ही ह्या वचनपूर्तीसाठी सज्ज असालच हीच आशा आहे! तरीही, कोकण महामार्गावर गेली कित्येक वर्ष होत असलेले अपघात आणि त्यात गेलेले बळी पाहता कोकणातल्या ‘दगडालाही’ पाझर फुटेल, पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? असा सवालही त्यांनी केला.
जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची ही वेळच आली नसती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः तुमचा आदर्श ठेवला असता, पण काय करणार तुमच्या लेखी मात्र प्रत्येक कार्यकर्ता हा नासमज असतो, हे तुमचेच विधान नाही का ? जनतेने भिरकावलेल्या दगडामागे कोणाची इच्छा नाही, तर त्यांचा उद्वेग असतो !
तुमच्या म्हणण्यानुसार जनतेला आम्ही बोळ्याने दुध पाजतो आणि तुम्ही मात्र डोळे झाकून वर्षानुवर्ष तुमच्याच मायभूमीला, आणि आपल्या चाकरमान्यांना प्रकल्प रखडवून यमसदनी धाडत आहात असे उद्गार काढल्यास तुमच्या जिव्हारी लागू नये म्हणजे झालं.
राज ठाकरें(Raj Thackeray) नी केलेले विधान अगदी तंतोतंत खरे ठरते, जर टोलनाके तोडफोडीची भरपाई माझ्याकडून घ्यायची असेल तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जबाबदारी केंद्र/राज्यामध्ये बसलेले सत्ताधारी घेणार का? तुम्ही म्हणता तुमची निष्ठा सर्वप्रथम देशाशी आहे, म्हणूनच का द्वारकेला जायचा ExpressWay सात वर्षांत बनतो आणि गेली सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण होत नाही. झोपलेल्या तोंडावर पाणी मारून उठवायची पद्धत आहे आणि झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणार्यांना महाराष्ट्रात दगड मारून उठवायची आमची पद्धत आहे.
पनवेल ते झारप ह्या मार्गाच्या कामावर स्वतः आठवेळा उतरून तुम्ही पाहणी केलीत, अहो जे तुमचं कर्तव्य आहे त्याचंच कसलं आलंय मोठेपण? आणि जर तुम्ही पहिल्या पाहाणीत योग्य ते निर्देश दिले असते तर कदाचित तुमच्यावर आठ वेळा चकरा मारायची वेळच आली नसती. जनतेला आत्ता केलेले वायदे तरी पाळावेत हीच आशा बाळगत आहोत. कारण दगड भिरकावणाऱ्या जनतेचा जेव्हा कोप होतो तेव्हा ती खडी फोडायच्याही लायकीची ठेवत नाही, इतकं लक्षात असू द्या म्हणजे झाले असेही मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.