मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कोरोना चाचणीची सक्ती न करता त्यांची अँटीजेन चाचणी करावी, अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी शेट्टी यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे नुकतीच केली होती. त्यावर राज्य शासनाने मागणी केली तर अशी विशेष रेल्वे सोडण्याची तयारी गोयल यांनी दाखवली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्टच्या परिपत्रकानुसार विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची तयारी दर्शविल्याबद्दल शेट्टी यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
या प्रवासासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकीट हेच प्रवासाचा इ पास समजण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी करण्याची किंवा मग कोकणात जाऊन १० किंवा १४ दिवस क्वारंटाईन होण्याची अट आहे. मात्र, या रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रॅपीड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करावी व ती चाचणी निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशांना कोरोना स्वॅब चाचणीची सक्ती करू नये तसेच त्यांना क्वारंटाईन देखील करू नये, असे शेट्टी यांनी सुचवले आहे.
तसेच १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना स्वॅब चाचणी करायला लावू नये. त्यांनादेखील हीच रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्यास सांगावे, ज्यायोगे त्यांना कोरोना चाचणीचा काही हजार रुपयांचा भुर्दंड पडणार नाही, असेही शेट्टी यांनी सुचवले आहे. कोकणात रहिवाशांची घरे लांब असल्याने तेथे एक प्रकारे आपोआपच सोशल डिस्टन्सिंग पाळल्यासारखे होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वरील सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.