मंत्रालय
मंत्रालयसरकारनामा

ठाकरे सरकारचं फर्मान : आत्महत्येचा इशारा गंभीरपणे ऐका!

आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पत्रांना केराची टोपली न दाखवता संबंधित विभागाच्या प्रमुखांनी ताबडतोब दखल घेऊन समस्येचा निपटारा करावयाचा आहे.

मुंबई : मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याच्या दोन घटना ऑगस्ट महिन्यात घडल्या आहेत, असे प्रकार रोखण्यासाठी आता राज्य सराकार (Uddhav thackeray government) पुढे सरसावले आहे. शेतकरी, बेरोजगार, अनुदानित शाळांवर काम करणारे शिक्षक यांच्या समस्यांची दखल जिल्हास्तरावर घेतली जात नसल्याने असे पीडित मंत्रालयापर्यंत (ministry) पोहोचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटनांची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीरपणे घेतली आहे.

यापुढे आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पत्रांना केराची टोपली न दाखवता संबंधित विभागाच्या प्रमुखांनी ताबडतोब दखल घेऊन समस्येचा निपटारा करावयाचा आहे. मात्र नियमबाह्य असेल तर त्या व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करावे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारनं काढलं आहे. मंत्रालयाशी संबंधित प्रश्न असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात संबंधित विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा असेही राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मंत्रालय
पंतप्रधान मोदी यांच्या युनोमधील भाषणातील महत्वाचे मुद्दे

मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याच्या दोन घटना ऑगस्ट महिन्यात घडल्याने राज्य सरकारने असे प्रसंग रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. गावाकडील जमीन व घरे बळकावल्याच्या वादातून पुण्यातील आंबेगाव येथील सुभाष जाधव याने मंत्रालयाच्या बाहेर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करीत रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी १५ ऑगस्टला सुनील गुजर या जळगावमधील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

राज्य सरकारने दिलेल्या सूचना

१)गरजेनुसार सुनावणीही घेऊन समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा

२) नियमात बसेल तर ती समस्या सोडवण्याचाच प्रयत्न केला जावा

३)नियमात नसेल तर संबंधितांना समजावून आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा. नसेल तर संबंधित पोलिस ठाण्यामार्फत त्यांच्यावर कारवाई करावी

४)अन्यायाच्या तक्रारीची आणि आत्महत्येच्या इशाऱ्याची दखल आयुक्तांपासून संबंधित यंत्रणेच्या संचालकांनी वैयक्तिकरित्या घ्यावी

५)पत्र मिळाल्यानंतर २४ तासाच्या आत पोलिस ठाण्याला त्याची सूचना द्यावी.

६) तक्रारदाराच्या समस्येची ताबडतोब माहिती घेऊन त्याला लेखी उत्तर द्यावे

काम होत नाही, अनुदान मिळत नाही, मंत्रालयात फाइल अडकली, अशा अनेक कारणांमुळे मंत्रालयासमोर आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याचा इशारा दिला जातो. मंत्रालयासमोर होणाऱ्या आत्महत्या; आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच अशा व्यक्तींची यादी काही दिवसापूर्वी लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com