पुणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत काय घडलं, याचा गौप्यस्फोट योग्य वेळ आल्यावर करेल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद राजकारणात उमटू लागले आहे. धर्मवीर चित्रपटात तर काहीच दाखवलेले नाही. अजून बरेच बाहेर काढायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यावर आता दिघे कुटुंबियांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी यावर फेसबुक पोस्ट लिहून शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार. मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?
मालेगाव येथे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आज तुम्हाला सगळं सांगत नाही. पण जसंजस समोरून बोलणं येईल. तसं मलाही तोंड उघडावं लागेल. मलाही तोंड उघडावं लागेल. मी तोंड उघडले तर भूकंप होईल. मी कधीही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही. मला तशी शिकवण बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली नाही. पण अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची शिकवण आत्मसात केली आहे. धर्मवीरांच्या बाबतीत जे काही झालेल आहे त्याच चित्रपटात उदाहरण दिलेलं आहे. प्रत्यक्ष जीवनात त्यांच्याबाबतीत काय घडलं आहे, त्यावर योग्य वेळी बोलेन.
शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. तुम्ही आमचे आईबाप काढता? आम्ही कधी आमच्या आईवडिलांना, मुलांना भेटलो? शिवसेना एके शिवसेना हेच आमचे सुरू होते. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेना मोठी झाली. आरोप-प्रत्यारोप करणे हा माझा स्वभाव नाही. मात्र गद्दारी केल्याचा ठपका आमच्यावर ठेवला जात आहे. मात्र काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना नेतृत्वाने गद्दारी केली, असा आरोप शिंदे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.