
Maratha Reservation News : मराठा आरक्षण आंदोलकांवर जालना जिल्ह्यात नुकताच बेछूट लाठीमार झाल्याने त्याचा राज्यभर सध्या जोरदार निषेध सुरु आहे. यानिमित्त हे आरक्षण पुन्हा चर्चेत आणि ऐरणीवर आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसह (एससीएसटी) इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आर्थिक निकषावर ते देण्यास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ते देण्याची मागणी त्यांनी केली.
जालन्यातील लाठीमाराचा आठवलेंनी यावेळी निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडे देशाच्या विकासाचा मुद्दा नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) विरोध करण्यासाठी ते एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तरी, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.
बोईसर (जि.ठाणे) येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. चांद्रयान दोन मोहीम अपयशी ठरल्यानंतर मोदींनी आपल्या संशोधकांना हिम्मत आणि प्रोत्साहन देऊन चांद्रयान तीनसाठी अधिक निधी दिला. त्यामुळे ती यशस्वी झाली आणि जगात भारताचा अधिक मान वाढला. त्यात आपल्या संशोधकांचे योगदान मोठे असून त्या यशामागे तेवढेच योगदान आहे असे आठवले म्हणाले.
एखादा चांगला प्रकल्प राज्यात येत असेल, तर दोन्ही बाजूंनी विचार करून मार्ग काढला पाहिजे अशी भूमिका त्यांनी वाढवण बंदराबाबत मांडली. दलित, आदिवासी, ओबीसी, मराठा, मुस्लिम, लिंगायत, ख्रिश्चन सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.