परमबीरसिंह तब्बल सहा महिन्यांनी आले मुंबईत अन् म्हणाले...

परमबीरसिंह यांना फरार घोषित करण्यात आले होते.
Parambir Singh
Parambir SinghSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) तब्बल सहा महिन्यांनी मुंबई दाखल झाले आहेत. गुरूवारी ते चंदीगड येथून मुंबईत आल्याचे समजते. खंडणीसह त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप असून त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सध्या ते गुन्हे शाखेच्या कार्यालयात असल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासही बजावले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारसह सीबीआयला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी परमबीरसिंह यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते लपून बसल्याचेही वकिलांनी सांगितले. पुढील 48 तासांत सीबीआयसमोर हजर राहण्याची कबुलीही त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.

Parambir Singh
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीची धावाधाव

मे महिन्यात वैद्यकीय सुटीवर गेलेले परमबीरसिंह हे अनेक महिने नॉट रिचेबल होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते गुरूवारी मुंबईत दाखल झाल्याचे समजते. मुंबईत आल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी आलो आहे. आत्ताच मी काही बोलणार नाही. मी आता न्यायालयातच बोलेन, असं परमबीरसिंह यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी परमबीरसिंहांवर ताशेरे ओढले होते. न्यायालय म्हणाले होते की, परमबीरसिंह हे जगाच्या कोणत्या भागात सध्या आहेत? तुम्ही या देशात आहात की परदेशात? आधी तुमचा ठावठिकाणा सांगा. तुमचा व्यवस्थेवर किती अविश्वास आहे, हेच तुम्ही दाखवून देत आहात. तुम्ही पोलीस आयुक्त होता म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक मिळणार नाही. केवळ अटकेपासून संरक्षण मिळाले तरच भारतात येणार, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

परमबीरसिंह यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू होती. खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना मुंबईतील न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना फरारी गुन्हेगार घोषित केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com