
Maharashtra Politics : सध्या राज्यात मुख्यमंत्री पदासाठी विरोधी पक्षनेते आजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाणही आले होते. त्या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आताचे सरकार पूर्णपणे स्थिर असून २०२४ पर्यंत टिकणार आहे. २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवून पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निर्णयावर सुरू असलेल्या चर्चांचे खंडण केले. फडणवीस म्हणाले, "न्यायालयाच्या निकालावर भाकित करणे योग्य नाही. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजिनामा दिला त्यानंतर न्यायालयाने तो नामंजूर करून सरकार आणावे,अशी अपेक्षा ठेवले चुकीचे आहे. आमच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार न्यायालय काही व्याख्या स्पष्ट करू शकते, मात्र साधारणपणे विधानसभेच्या किंवा विधानमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही."
फडणवीस यांनी तत्कालीन राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही सांगितले. फडणवीस म्हणाले, "ज्यावेळी काही आमदार राज्यपालांना सांगतात की आम्ही सरकारसोबत नाही. त्यांची संख्या इतकी आहे की त्यामुळे सरकार टिकू शकणार नाही. या स्थितीत राज्यपालांना पक्षांतरबंदी कायदा पाहिणे गरजेचे नसते. ते राज्यपालांच्या आखत्यारितच नाही. अशा वेळी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगतात. तो एकच पर्याय त्यांच्याकडे उरतो. तेच राज्यपालांनी केले. ठाकरेंकडे बहुमत नव्हते. आता निवडणूक आयोग्याच्या निर्णयामुळे खरी शिवसेना आमच्याकडे आहे. त्यामुळे सरकारला काही धोका नाही."
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर (MVA) टीकाही केली. तसेच आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाबाबतही भाष्य केले. फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडी ही जनतेच्या हितासाठी तयार केलेली नाही. ती राजकीय गरजेपाटी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनता त्यांना जागा दाखवून देईल. आता लोकसभा किंवा विधानसभेला आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. भाजपला (BJP) २३ जागा तर शिवसेनेला १८ जागा होत्या. आता भाजपला जास्त जागा मिळतील आणि शिवसेनेला त्यांच्या जागा मिळतील."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.