मुंबई : हनुमान चालिसावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. शिवसेनेनं कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचणारच असा ठाम निर्धार अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बोलून दाखवला आहे. आज सकाळी ते मातोश्रीवर जाणार आहेत. त्यासाठी राणा दाम्पत्यांचे खार येथील निवासस्थान व मातोश्री परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. (mp Navneet Rana Vs shivsena in Mumabai)
याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सर्वांना शांततेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी काही आरोप देखील केले आहेत, हे कोणाच्या तरी सांगण्यावरून सुरू आहे. राणा दाम्पत्याने कोणाची तरी सुपारी घेतली असावी. समाजात असंतोष निर्माण करण्याचे हे कृत्य आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे हे दाखवण्याचा त्यामागचा उद्देश आहे, असाही आरोप वळसे पाटील यांनी केला आहे.
वळसे पाटील यांनी यावेळी राणा दाम्पत्याला काही सल्ले देखील दिले आहेत. ते म्हणाले, गेले २-३ दिवस विनाकारण हा मेलोड्रामा सुरू आहे, पण काय करायचं ते आपापल्या घरी करा. पुढे काय करायचे पोलिसांना माहिती आहे. विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका. दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करण्याची गरज नाही असाही सल्ला वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.