विरार : न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने पालघर जिल्हा परिषदेमधील 15 उमेदवारांचे पद गेले. त्या रिक्त झालेल्या जागांवर पाच ऑक्टोबरला मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्याने साऱ्याच पक्षाची धावपळ होणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देऊन निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे.
या निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवारच देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार नसतील तिथे बाहेरचे उमेदवार न देता स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी सांगितले. राज्यातील सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणूका ओबीसी आरक्षणावरून रखडल्या होत्या.
त्यांचा मार्ग मोकळा झाला असून आता या निवडणूका पाच ऑक्टोबरला घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, त्याबाबतचा निवडणुकीचा कार्यक्रम ही आयोगाने जाहीर केला आहे. त्यात पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सध्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये भाजप वगळून महाविकास आघाडीची सत्ता असली तरी या निवडणुकीत मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे काँग्रेस या ठिकाणी स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याचे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी जाहीर केल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आवश्य वाचा : शिवसेनेच्या बडेंना मिळाले महापालिकेचे सभागृहनेते पद
त्याच बरोबर येत्या दोन दिवसांत येथील उमेदवार ही निश्चित केले जाणार असून त्याची घोषणा ही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्याबरोबर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिल्याने आता सत्तेतील इतर पक्ष काय करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.