मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर व महागाईच्या मुद्यावरून महाविकास आघाडीकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका केली जात आहे. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच त्याविरोधात एल्गार पुकारण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना केले. महाराष्ट्र सरकारमुळेच महागाई वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. (Devendra Fadnavis Latest Marathi News)
मुंबईत पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत फडणवीस यांनी महागाईच्या मुद्दयावरून आघाडी सरकारला धारेवर धरले ते म्हणाले, रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरात सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. युरोप, अमेरिकेतही भाववाढीची चर्चा आहे. पण त्याचवेळी भारताने ठोस उपाययोजना केल्या. रशियाकडून स्वस्तात इंधन घेताना अमेरिकेचाही दबाव जुगारला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाववाढ झाल्यानंतर देशात दोनदा भाव कमी केला. केवळ उत्पादन शुल्क कमी केले नाहीत तर केवळ केंद्राला मिळणारा सेस कमी केला. (Petrol Diesel Latest Marathi News)
दोनदा भाव कमी केल्यामुळे केंद्राला दोन लाख वीस हजार कोटी रुपये नुकसान झाले आहे. पण महाराष्ट्रातील सरकार मे महिन्यात एप्रिल फूल बनवत आहे. केंद्राने टॅक्स कमी केल्यानंतर आपल्याकडचा टॅक्सही आपोआप कमी झाला. राज्य सरकारला केवळ 2500 कोटीचे नुकसान आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
आता माझा नाना पटोले, अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल आहे. तुम्ही रोज महागाईवर टाहो फोडता. पेट्रोल-डिझेलवर केंद्राचा टॅक्स आहे 19 रुपये आणि राज्याचा टॅक्स 29 रुपये आहे. पुर्वी राज्याच्या टॅक्सपेक्षा केंद्राचा टॅक्स किमान एक रुपये जास्त असायचा. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. मग आता सांगा महागाई कुणामुळे? पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला जबाबदार 19 रुपयांचा टॅक्स लावणारे की 29 रुपयांचा, टॅक्स कमी करणारे की, टॅक्स कायम ठेवणारे, असं फडणवीस म्हणाले.
पण यांना लाजच वाटत नाही. एवढी बेशरम लोकं मी पाहिले नाहीत. उद्या पुन्हा हे टाहो फोडतील. केंद्र सरकारमुळे भाववाढ झाली. त्यामुळे या सरकारविरोधात एल्गार पुकारला पाहिजे. कर कमी करण्यासाठी आपण आंदोलन केले पाहिजे. या लबाडांना उघडं पाडायला हवं. महागाई कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कुठलंही काम होत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.