
Mumbai : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रचंड चर्चेत आले आहेत. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतात याकडं ठाकरे आणि शिंदे गटासह सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. परदेश दौऱ्यानंतर मुंबई दाखल झालेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबईत राहुल नार्वेकर(Rahul Narwekar)यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नार्वेकर म्हणाले,निर्णय घेताना उशीर केला जाणार नाही तसेच निर्णय घेण्याची घाई देखील केली जाणार नाही. सर्व नियमांमध्ये बसेल असा आश्वासक निर्णय आम्ही घेऊ असं विधान नार्वेकर यांनी केलं आहे. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)च्या निकालानंतर पहिल्यांदाच राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळात दाखल झाले होते. यावेळी नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय देताना सर्व योग्य काम केलं. ते म्हणजे संविधानिक शिस्त कायम ठेवली आहे. कार्यकारी मंडळ, विधीमंडळ आणि न्यायमंडळ तिघांनाही संविधानानं आपापल्या क्षेत्रात राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही एकमेकांच्या क्षेत्रात कार्याशिवाय हस्तक्षेप करु नये असंही संविधानात नमूद करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं या सर्व बाबी लक्षात घेऊन अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो.
16 आमदारांच्या अपात्रतेवर निपक्ष:पाती निर्णय घेणार
माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका आहेत, लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका आहेत. लवकरच निर्णय घेणार असून ठाकरे गटाचं कोणतही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं. याचवेळी घाईत चुकीचा निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. 16 आमदारां(MLA)च्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
...तर मग मी दोन महिन्यांत कसा निर्णय घेऊ?
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना जुलै २०२२ मध्ये नेमका राजकीय पक्ष कोणता गट होता? हा निर्णय घ्यायला सांगितलय. राजकीय गट निश्चित केल्यानंतर त्याची इच्छा काय होती? प्रतोद कोण? याबद्दलची त्यांची भूमिका जाणून घेऊ असं नार्वेकर म्हणाले. कोर्टाला निर्णय घ्यायाला. 10 महिने लागले. राजकीय पक्ष कोण? हे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाल तीन-सहा महिने लागले, मग मी दोन महिन्यांत कसा निर्णय घेऊ? असा मुद्दा राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला. “जो निर्णय येईल, तो नियम आणि घटनेनुसारच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नार्वेकरांचा राऊतांच्या टीकेवर पलटवार...
संसदेच्या सदस्यानं अत्यंत जबाबदारीपूर्वक व संविधानिक पध्दतीनं भाष्य करणं गरजेचं असतं. ज्यावेळी आपण भाष्य करत असतो आणि तेही एका संविधानिक पदावरील व्यक्तीवर करत असतो. तेव्हा जबाबदारीपूर्वक वक्तव्यं करणं अपेक्षित असतं. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही व्यक्तींकडून करणं व्यर्थ आहे. त्यामुळे अशा लोकांना दुर्लक्षित करणं योग्य आहे. त्यांच्या वक्तव्यांना महत्व न देणं हे आपल्या लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीनं योग्य राहील अशा शब्दांत नार्वेकरांनी संजय राऊतांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.