मुंबई : ज्येष्ठ नेते भारत भालके आपल्यात नसल्याबाबत विश्वास बसत नाही. त्यांनी कोरोनाशी लढा दिला, परंतु त्यांना अखेर काळाने साथ दिली नाही. त्यांच्या रुपाने आपण एका गावरान वक्तृत्वाला हरपलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत आपल्या भावना व्यक्त करीत भालके तसेच इतर दिवंगत आमदारांना श्रद्धांजली अर्पण केली.
विधानसभेच्या अधिवेशनात आज दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत भालके, विष्णू सावरा, जावेद खान, सरदार तारासिंह, नारायण पाटील तसेच इतर दिवंगत सदस्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.
भालके यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, माझा विश्वास बसत नाही, की भारतनाना आपल्यात नाहीत. मला तो दिवस आठवतोय, भारतनाना हे आमच्या पक्षाच्यावतीने निवडणूक लढवित होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी मी पंढरपूरला गेलो होतो. जणू काही आपल्या कुटुंबातील एक माणूस आपले प्रतिनिधीत्त्व करीत आहे, असे वातावरण त्या वेळी होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी मात्र हार मानली नाही. त्यांनी त्यांचे काम चालूच ठेवले. आपली खास ओळख निर्माण केली होती. ते करारी होते. बोलायला लागल्यानंतर त्यांची एक संवेदना दिसून यायची. कोरोनाने जगभर काहूर केला. त्यात भालके यांनाही कोरोनाने गाठले. लढत राहणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कोरोनाशी यशस्वी लढाई केली होती.परंतु काही लढाया अशा असतात, की शत्रू कसा घात करेल ते सांगता येत नाही. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर ते जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिले. लढता लढता आपल्यातून निघून गेले. अशी माणसं ज्या वेळी काम करीत असतात, त्या वेळी आपल्यालाही एक हुरूप येते. दुर्दव्याने ते आपल्यातून निघून गेले. एक गावरान वक्तृत्व होते. सलग 18 वर्षे त्यांनी विठ्ठल सहकारी साखऱ कराखान्याची धुरा वाहिली होती. ज्या वेळी मी मुख्यमंत्रीपदाची धुरा उचलली, त्या वेळी त्यांनीही चांगली साथ दिली, असे हे भारतनाना आपल्यातून निघून गेले, याचे मोठे दुःख आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी सांगितल्या नानांच्या आठवणी
भारनाना भालके यांच्याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतनानांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. कुस्तीची अनेक मैदाने त्यांनी गाजविली. दहावी पर्यंत शिक्षण घेतले. ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना जाण होती. गाव पातळीवरील सर्वसामान्यांतून पुढे आलेले नेतृ्त्त्व होते. तालुक्याच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भैरवनाथ विद्यालय, विठ्ठल प्रशाला, साखार कारखान्यांचे चेअरमन म्हणून त्यांनी चांगले काम केले. जमीन तुमची, ड्रीप कारखान्याचे ही योजना त्यांची खूप प्रसिद्ध झाली होती. त्यांनी अथक प्रयत्न केले. कमावलेले शरीर, बोलण्य़ाचा ग्रामीण बाज यामुळे त्यांची छाप पडत होती. निर्णयक्षमता, बोलण्याची शैली या गुणांवर ते सर्वांचे मित्र बनले. पंढरपूरसारख्या शहरात, ज्या ठिकाणी लाखो भाविक येतात, तेथे नाना कायम विविध कामांसाठी आग्रही असायचे. ते स्वतः वारकऱ्यांसोबत सामील व्यायचे.
विष्णू सावरा एक मितभाषी नेतृत्त्व
विष्णू सावरा यांच्या विषयी बोलताना मुख्यंमत्री ठाकरे म्हणाले, की भाजपशी आमची युती होती, त्या वेळी सलग 20 ते 25 वर्षे विष्णू सावरा व आम्ही एकत्रित काम केले. कोणीही चांगल्या पगाराची नोकरी सोडून राजकारणात येण्याचे धाडस करीत नाहीत. परंतु त्यांनी हे धाडस केले. अतिशस मितभाषी नेतृत्त्व होते. आदिवासी वाडा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. बॅंक आॅफ इंडियात त्यांनी नोकरी केली, मात्र ही नोकरी सोडून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाला, त्या वेळी प्रथम पालकमंत्री होण्याचा त्यांना मान मिळविला होता, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सावरा यांच्या आठवणी जागविल्या.
Edited by - Murlidhar Karale