
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्वाचा ठरणार आहे. दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. या बैठकीत सरकार बरखास्त करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (MahaVikas Aghadi Latest Marathi News)
पुढील काही तास राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणार, हे निश्चित आहे. पण आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेणार, एकनाथ शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलणार यावर सर्व घडामोडी अवलंबून आहेत. पण शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी विधानसभा बरखास्तीबाबत केलेल्या ट्विटमुळे आता ठाकरे सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
राऊत यांच्या ट्विटचे अनेक अर्थ निघतात. काही वेळात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार बरखास्तीचा प्रस्ताव येऊ शकतो. हा प्रस्ताव मंजूर करून राज्यपालांकडे पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण राज्यपाल हा प्रस्ताव मंजूर करणार हा मोठा प्रश्न आहे. कारण शिंदे यांच्या भूमिकेमुळे सरकारकडे सध्या पुरसे संख्याबळ नाही. अशावेळी राज्यपाल हा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता कमी आहे.
सरकार बरखास्तीचा प्रस्ताव आला नाही तर मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देऊन पायउतार होऊ शकतात. त्यानंतर शिंदे यांच्या मदतीने भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. शिंदे यांच्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ते वेगळा गट स्थापन करू शकतात. त्यामुळे या आमदारांची आमदारकी शाबूत राहील. या गटाने भाजपला समर्थन दिल्यास राज्यपाल सरकार स्थापनेसाठी त्यांना आमंत्रित करतील, अशीही शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाविकास आघाडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे पहिले संकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीही सूटक ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut Latest News)
महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पर्यावरण मंत्री असा उल्लेख हटवला आहे. त्यावर त्यांनी फक्त युवा सेना अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष एवढाच उल्लेख ठेवला आहे.
आदित्य यांच्या या ट्विटनंतर संजय राऊतांनीही सूचक ट्विट केलं आहे. 'महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,' असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.