मुंबई : गुजरातच्या खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या 2 बोटी आणि त्यावरील 16 मच्छिमारांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. यातील सात जण हे पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती पालघर मच्छिमार संघटनेने दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं ताब्यात घेतलं असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यानंतर पालघरमधील डहाणू, तलासरी विक्रमगड या दुर्गम भागातील मच्छिमार गुजरातमधील बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. रोजगारासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो नागरिक पावसाळ्यानंतर गुजरातमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटींवर काम करण्यासाठी जात असतात.
गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि आणखी एक बोट मासेमारीसाठी खोल समुद्रात गेली असता पाकिस्तान सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं ताब्यात घेतलेल्या सोळा जणांपैकी सात जण पालघरमधील आहेत. पाकिस्तान इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस एन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
गुजरात पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने गुजरातमधील मच्छिमार अनेकदा मासेमारी करता करता अनावधानाने पाकिस्तानच्या सीमेत जातात. पाकिस्तानच्या समुद्री सीमेत जाणाऱ्या बोटींवर पाकिस्तानकडून अशी कारवाई करण्यात येते. याआधी अनेक वेळा भारतीय सीमेत असताना देखील पाकिस्तानी सैनिकांनी अशी कारवाई केली आहे. पण पालघरचे तत्कालीन दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पाठपुराव्यानंतर काही खलाशांची पाकिस्तान सरकारने सुटका केली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.