उद्धव ठाकरेंच्या पहिल्या प्रतिक्रियेने मंत्री संजय राठोडांना भय आणि अभयही!

चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
uddhav-pooja-rathod
uddhav-pooja-rathod

मुंबई : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली असून एखाद्याच्या आयुष्याशी खेळायला नको. चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, असे सांगितले आहे. ``याबद्दल सखोल चौकशी केली जाईल. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे प्रयत्नदेखील व्हायला नको. गेले काही दिवस काही महिने आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेही दिसून आले. असेही व्हायला नको. त्याची सखोल तपासणी केली जाईल आणि जनतेला सत्य काय ते कळेल,`` अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.  

पूजा चव्हाण हिचा मृत्यूशी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. विरोधी पक्षांनी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चार वाक्यांतच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी थेट राठोड यांचा थेट राजीनामा घेतलेला नाही किंवा क्लिन चिटही दिलेली नाही. चौकशी करणार असल्याचे सांगितल्याने त्यानंतरच राठोड यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याचे दिसून येत आहे. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाची सुई मंत्री राठोड यांच्याकडे जात आहे. मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांची मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी करावी. या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. या एसआयटीमध्ये आयपीएस आधिकारी यांचा समावेश असावा, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. 

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा सत्याचा वारसा नेणार का? :  चंद्रकांत पाटील यांची टीका
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार काहीच स्पष्टता आणत नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे राहायचे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वडिलांचा सत्याचा वारसा पुढे चालविणार का? वर्षभरापासून आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, त्यांची चौकशीही केली जात नाही. या सरकारची प्रतिमा डागाळत चालली असून, राज्यात असुरक्षितता वाढत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, राज्यात ज्या वेळी अन्यायाच्या घटना घडल्या, त्या वेळी आमच्या राज्य सरकारने न्यायाची भूमिका घेतली होती. मात्र पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. या आत्महत्येला एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे. तरी पण या प्रकरणाचा तपास होत नाही. शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालणारे ठाकरे सरकार पूजा चव्हाणला न्याय मिळवून देणार का? असा प्रश्‍न पाटील यांनी केला.


सीड्या लावा चौकशी करा
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपच्या सीड्या बाहेर काढीन असा इशारा देत आहेत त्याबद्दल पाटील म्हणाले, ‘‘जर आमच्या पक्षाचे कुणी चुकीचे वागले असेल तर सीड्या बाहेर काढा, आणि चौकशी करा, दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. राज्यातील एक मंत्री बंगल्यावर नेऊन मारहाण करतो त्याची चौकशी होत नाही, एक मंत्री त्यांच्या विवाहबाह्य संबंधांची कबुली देतो पण चौकशी होत नाही. तरुणी आत्महत्या करते तरीही चौकशी होत नाही. जर पूजाच्या आत्महत्येत हा मंत्री सहभागी नसले तर सरकारने तसे स्पष्ट करावे. तिच्या घरच्यांनी तक्रार दिली नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरून सरकारने स्तःहून तक्रार दिली पाहिजे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com