प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे हुतात्म्यांबाबत उदासीन का ?

अधिकाऱ्यांनी दिवसभर तेथे बसून संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत त्यावेळच्या बातम्या-साहित्य यांचे वाचन करून आत्मपरीक्षण करून नंतर निर्णय घ्यावा. त्यामुळे तरी या अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचेल, अन्यथा आपणच पुढाकार घेऊन हुतात्म्यांच्या वारसांना सदनिका द्याव्यात.
Abhijeet Samant - Thackeray - Chavan
Abhijeet Samant - Thackeray - Chavan

मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या १०६ जणांच्या वारसांना घरे देण्याबाबत निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवून या प्रस्तावावर विचार करायला लावावा, अशी सूचना भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे हुतात्म्यांच्या वारसांना घरे मिळावीत, यासाठी का मागे हटत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी ही सूचना केली आहे. या हुतात्म्यांच्या वारसांना घरे मिळावीत, यासाठी सामंत पहिल्यापासून आग्रही आहेत. गेली अनेक वर्षे हा विषय महापालिकेच्या विधी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडूनही यासंदर्भात प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. महापालिका प्रशासन या १०६ हुतात्म्यांचे बलिदान विसरले आहे. किंबहुना प्रशासनाने त्याकडे मुद्दाम व उद्दामपणे दुर्लक्ष केले आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

या विषयावर प्रशासनाने आतापर्यंत वेगवेगळे अभिप्राय दिले आहेत. अशा प्रकारची बाब महापालिकेच्या अधिकारकक्षेत येत नाही, त्यामुळे हे धोरण राज्य सरकारने ठरवावे, महापालिका असे धोरण ठरवू शकते, महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असे वेगवेगळे अभिप्राय प्रशासनाने या विषयावर दिल्याचेही सामंत यांनी दाखवून दिले आहे. 

आजपर्यंत मुंबईत अनेकदा अवैध बांधकामे क्षमापात्र झाल्यावर किंवा अनधिकृत झोपडीधारकांना सदनिका दिल्या गेल्या. मात्र या हुतात्म्यांच्या वारसांना उपेक्षित ठेवले गेले, असेही सामंत यांनी म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे सरकार सध्या महाराष्ट्रात आहे. तरीही महापालिका प्रशासन या प्रश्नावर चालढकल करीत आहे, ही खेदाची बाब आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

त्यामुळे या प्रश्नावर विचार करून निर्णय घेण्याला जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना एक दिवस हुतात्मा चौकात कोणत्याही मंडप व इतर सोयींशिवाय (उन्हात) बसवावे. या अधिकाऱ्यांनी दिवसभर तेथे बसून संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत त्यावेळच्या बातम्या-साहित्य यांचे वाचन करून आत्मपरीक्षण करून नंतर निर्णय घ्यावा. त्यामुळे तरी या अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचेल, अन्यथा आपणच पुढाकार घेऊन हुतात्म्यांच्या वारसांना सदनिका द्याव्यात. तरच या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळेल, असेही खडे बोले सामंत यांनी सुनावले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com