भाजप नेत्यांनी वारंवार राजभवनाच्या नव्हे, स्वतःच्या अंगणात जावे

सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या, तर त्यांचे स्वागतच केले जाईल.
fadvis
fadvis

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले असून, वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

भाजपाच्या फसलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या, तर त्यांचे स्वागतच केले जाईल, परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे.

चंद्रकांतदादांचे खरे अंगण कोणते

चंद्रकांतदादा पाटील यांचे खरे अंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून, या `मेरा आंगण मेरा रणांगण` या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले.

फडणवीस यांचा समाचार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की विविध राज्यांतील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला कररूपाने सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित मदत दिली जात नाही. वैद्यकीय उपकरणे, PPE कीट, टेस्टिंग कीट, औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य मागणीच्या अवघे ३० टक्के पुरवली जात आहेत.

केंद्र सरकारने जीएसटी परताव्याची रक्कम, विविध कल्याणकारी योजनांचा निधी व जीएसटी व्यतिरिक्त इतर करांच्या परताव्यापोटी रक्कम अद्याप दिली नाही. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेज मधील २ लाख दहा हजार कोटी रुपयेच खर्च करण्यासारखे आहे, त्यातील सर्वाधिक रक्कम ही मनरेगा साठी आहे, त्यामुळे यातून कोणालाही थेट मदत मिळत नाही.

राज्य सरकारने आतापर्यंत ४३४ ट्रेनमधून ६ लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवले आहे. तर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून ३ लाख ६५ हजार मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांची संख्या पाहता दररोज ९० रेल्वे सोडणण्याची आवश्यकता आहे, मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० गाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

राज्यात ६ लाख गरीब आणि स्थलांतरित बांधवाना मोफत जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील ८.५० कोटी नागरिकांना रेशनद्वारे धान्य पुरवठा केला जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडे गहू पुरवठा करण्याची मागणी केली आहे, पण केंद्र सरकारने अद्याप गहू दिला नाही. फडणवीसांनी अंगणाला रणांगण बनविण्यापेक्षा पक्षातले आपण वजन खर्च करून महाराष्ट्राच्या हिश्श्याची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे थोरात म्हणाले.  

हे कुठले शहाणपण

संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपाची आजही ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्स, पोलीस दल, सफाई कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले योगदान देत आहेत. अशा वेळी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी गरीब जनतेला मदत करावी असे थोरात म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com