‘जळाला रे जळाला, नागपूर करार जळाला’

करारानुसार विदर्भातील तरुणांना २३ टक्के सरकारी नोकऱ्या, राज्याच्या तिजोरीतील २३ टक्के वाटा, सिंचनासाठी ७५ हजार कोटी, रस्त्यासाठी ५० हजार कोटी देऊ केले. प्रत्यक्षात ते दिलेच नाही. याउलट येथील निसर्गसंपदा लुटून नेली.
Vidarbha Rajya Andonan Samiti
Vidarbha Rajya Andonan Samiti

नागपूर : सन १९५३ मध्ये आजच्याच दिवशी नागपूर करार झाला होता आणि त्यानंतर १९६० संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय होत आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवीत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज संपूर्ण विदर्भात नागपूर कराराची होळी करण्यात आली. उपराजधानीतील संविधान चौकात विदर्भवाद्यांनी नागपूर करार जाळला. प्रचंड घोषणाबाजी करीत वेगळ्या विदर्भाची मागणी बुलंद केली.
 
नागपूर कराराचा निषेध असो, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, आमचे राज्य - विदर्भ राज्य आदी घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला. त्याच आधारे १९६० मध्ये विदर्भ विलीन करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय सुरू आहे. विदर्भातील वीज, पाणी, कोळसा, खनिज, लोखंड सह २३ प्रकारच्या खनिज संपत्तीचे दोहन सुरू करीत पश्‍चिम महाराष्ट्राला समृद्ध करण्यात आले. 

याविरोधात विदर्भवाद्यांकडून २८ सप्टेंबर हा काळा दिवस पाळला जातो. संविधान चौकातील आंदोलनात मुकेश मासुरकर, रेखा निमजे, विष्णू आष्टीकर, सुयोग निलदावार, नितीन अवस्थी, सुनिता येळणे, जे. एस. ख्वाजा, रवींद्र भामोडे, गणेश शर्मा, प्रीती दिडमुठे, ज्योती खांडेकर, प्रशांत मुळे, गुलाबराव धांडे, तात्यासाहेब मत्ते, रामेश्‍वर मोहबे, शोभा येवले, नौशाद हुसेन, राजेंद्र सतई, नरेश निमजे, अण्णाजी राजेधर, राजेश बंडे, जीवन रामटेके, रामभाऊ कावडकर, रजनी शुक्ला आदी सहभागी झाले होते. 

विदर्भात शंभर ठिकाणी निषेध 
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुकास्तरावर एकूण शंभर ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली. जळाला रे जळाला, नागपूर करार जळाला, महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, वेगळा विदर्भ झालाच पाहीजे, आमचे राज्य- विदर्भ राज्य, आदी घोषणांसह वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली. करारानुसार विदर्भातील तरुणांना २३ टक्के सरकारी नोकऱ्या, राज्याच्या तिजोरीतील २३ टक्के वाटा, सिंचनासाठी ७५ हजार कोटी, रस्त्यासाठी ५० हजार कोटी देऊ केले. प्रत्यक्षात ते दिलेच नाही. याउलट येथील निसर्गसंपदा लुटून नेली. ६४ वर्षांपासून सुरू असणाऱ्या लुटीचा निषेध यावेळी विदर्भवाद्यांनी नोंदवला. 
(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com