संसदीय परंपरा आणि विदर्भासाठी नागपुरात अधिवेशन आवश्‍यक : अनंत कळसे

धान, सोयाबीन, कापूस, संत्रा असे एक ना अनेक विदर्भातील प्रश्‍न अधिवेशनात मार्गी लागले आहेत. यासाठी विदर्भाला पॅकेज दिले गेले आहे. निधीची तरतूद केली गेली आहे. प्रस्ताव आणि ठरावांच्या माध्यमातून प्रश्‍नांची सोडवणूक होते. त्यामुळे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणे अत्यावश्‍यक आहे.
Anant Kalse
Anant Kalse

नागपूर : दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन यावर्षी न घेता, अधिवेशनावर होणारा खर्च कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पण नागपूर करारानुसार आणि संसदीय परंपरेच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशन नागपुरात होणे आवश्‍यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी आज ‘सरकारनामा’शी बातचीत करताना सांगितले. 

श्री कळसे म्हणाले, यापूर्वीही बरेचदा असे प्रश्‍न विचारले गेले आहेत की, नागपूर अधिवेशनाचा खर्च विदर्भाला द्या. त्यातून विदर्भाचा विकास होईल, पण या मागणीत काही तथ्य नाही. केवळ अधिवेशनाचा खर्च मिळवून विदर्भाचा विकास होणार नाही. गेल्या ४० वर्षांपासून याच अधिवेशनात विदर्भाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागलेले आहेत. धान, सोयाबीन, कापूस, संत्रा असे एक ना अनेक विदर्भातील प्रश्‍न अधिवेशनात मार्गी लागले आहेत. यासाठी विदर्भाला पॅकेज दिले गेले आहे. निधीची तरतूद केली गेली आहे. प्रस्ताव आणि ठरावांच्या माध्यमातून प्रश्‍नांची सोडवणूक होते. त्यामुळे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणे अत्यावश्‍यक आहे. 

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात नियमाप्रमाणे कामकाज चालते. यामध्ये नियमांनुसार प्रश्‍न दिले जातात. शासनाच्या प्रत्येक विभागात प्रश्‍नांची संख्या जर बघितली तर त्यामध्ये विदर्भाचे प्रश्‍न असतात. फक्त ते बॅलेटमध्ये आले पाहिजे, स्वीकृत झाले पाहिजे, हे महत्वाचे आहे. विधिमंडळाचं काम संपूर्ण राज्यासाठी आहे. लक्षवेधी सूचना आणि विविध ठराव विदर्भाच्या बाबतीत येत असतात. तारांकित प्रश्‍न, अल्पसूचना प्रश्‍न यांच्या माध्यमातूनही कामे होत असतात. नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरला होता आणि तो मार्गी लागतोय. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेऊ नये किंवा त्यावरील खर्च विदर्भाला द्यावा, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मत अनंत कळसे यांनी मांडले.

सुधीर मुनगंटीवारांनी केली ‘गोंडवाणा’ची स्थापना
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडवाणा विद्यापीठाची स्थापना निव्वळ ठरावांच्या माध्यमातून केलेली आहे. सभागृहात ठराव मांडल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला. याशिवाय कॉंग्रेस, शिवसेना आणि इतरही पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात केवळ ठरावांच्या माध्यमातून मोठमोठी कामे केलेली आहे. महाकाय गोसेखुर्द प्रकल्पसुद्धा विदर्भात साकारला गेला, ती सुद्धा अधिवेशनाची देण आहे, असे श्री कळसे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com