सातारा : मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकार व केंद्राचा टोलवाटोलवीचा प्रकार सुरू आहे. मुळात या आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातून स्थगिती उठल्यास समाजातील युवकांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण प्रश्नाचा तुकडा पाडावा, अशी अपेक्षा भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली असून याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांच्या नोकरीचा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज पत्रकारांशी बोलताना परखड मत व्यक्त केले.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा आरक्षणावरील स्थगिती अजून उठलेली नाही. सर्वोच्च न्यायालयातही काहीही होत नाही. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा तरूणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज या समाजातील मोठ्याप्रमाणात युवक नोकरीच्या संधीच्या प्रतिक्षेत आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून स्थगिती उठविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायला हवेत. केवळ आरक्षण प्रश्नाचा चेंडू एकमेकांकडे टाकणे हाच प्रकार सुरू आहे. याचा सर्वच प्रवर्गातील मुलामुलींनाही त्रास होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन आरक्षण प्रश्नाचा तुकडा पाडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.