सातारा : कठापूर, जावली, पिंगळी बुद्रुक, सातेवाडी व पोतले या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिक
दाखल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण, माण, खटाव व कऱ्हाड तालुक्यातील आठ ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी स्थगित केल्या आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, कोरेगांव तालुक्यातील कठापूर, फलटण तालुक्यातील जावली, माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक, खटाव तालुक्यातील सातेवाडी व कराड तालुक्यातील पोतले या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत.
सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 30 (5) व मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या पाच फेब्रुवारीच्या आदेशानुसार कोरेगांव, फलटण, माण, खटाव व कराड या तालुक्यातील आठ ते 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत रोखून ठेवाव्यात.
उर्वरित तालुक्यातील निवडी होणार...
उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी मंगळवारी (ता. 9) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी सातारा यांच्या न्यायालयात घेण्यात येणार आहे. त्यामुळे या तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित सहा तालुक्यांत सातारा, जावली, वाई, महाबळेश्वर, खंडाळा व पाटण येथील ग्रामपंचायतींच्या आठ ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी यापूर्वी देण्यात आलेल्या नमूद आदेशानुसार पार पाडण्यात याव्यात, असे आदेशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

