मुंबई : मुंबई व कोकणात चार दिवस सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. राष्ट्रीय संघ स्वयंसेवकांच्या स्वयंसेवकांनी कल्याण-डोंबिवली, रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरु केले आहे. RSS Karyakarta help Flooded Areas In Mumbai and kokan
कल्याण डोंबिवली येथे मागील काही दिवसांत अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कोपर पूर्व व पश्चिम येथील अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या मदतीने सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. काही नागरिकांची शाळा आणि मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. सुमारे ४०० नागरिकांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली.
हेही वाचा : विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात
रायगड जिल्हयातील खारीकवाडा, नांदगाव, उसर्ली, बोर्लीनाका, आदाड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी भरल्यामुळे अडकलेल्या जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. रा. स्व. संघाच्या वतीने खेड येथील आपत्तीग्रस्त १०० कुटुंबांना दोन वेळचे जेवण तसेच ३०० रेल्वे प्रवाशांना अल्पोपाहार देण्यात आले.
चिपळूण येथील आपत्तीग्रस्तांना ७५०० फूड पॅकेट्स वितरित करण्यात आले. डेरवण येथे २ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. बचाव कार्यासाठी बोटी आणल्या असून लवकरच बचाव कार्यास सुरुवात करण्यात येणार आहे. बचावकार्यानंतर आपत्तीग्रस्तांच्या राहण्याची व्यवस्था तसेच भोजन, अल्पोपाहार, पाणी व प्रथमोपचार इ. व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
मदतीसाठी संपर्क महाड बेस कॅम्प- बुटाला सभागृह, मुंबई -गोवा महामार्ग, महाड करिता गणेश मेहेंदळे (7020600830) यांच्याशी किंवा उदय चितळे, पाग पॉवर हाऊस, चिपळूण(8446281551) यांच्याशी किंवा 918888142566, 917264889511, 9423527458 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी रा.स्व.संघामार्फत करण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. स्थानिक प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करणे तसेच सेवा केंद्र सुरू करून गरजूंना भोजन व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. घरे आणि परिसर स्वच्छ करणे, जंतुनाशकांची फवारणी, शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच काही ठिकाणी मोठ्या जनरेटरद्वारे तात्पुरती विजेची सोय करणे, आदी सेवाकार्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत.
नागरिकांकरिता स्वच्छ पिण्याचे पाणी, मेणबत्या / सोलर चार्जर, अंथरूण -पांघरूण, कपडे, क्लोरोवॅट अथवा अन्य पाणी शुद्धीकरण सामग्री, फ्लोअर वायपर, सॅनिटायझर कॅन, डीडीटी व जंतुनाशक पावडर, फवारणी पंप, औषधे, फिनेल कॅन, बेबी फुड / दूध पावडर, ताडपत्री, इलेक्ट्रॉल व ग्लुकोज पावडर, तसेच जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
जास्तीत जास्त दानशूरांनी या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक साहाय्य करावे यासाठी रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक दानशूर http://www.rssjankalyan.org/seva -nidhi/ या वेबसाईट च्या साहाय्याने किंवा Account- RSS JANAKALYAN SAMITI, Bank of Maharashtra, Acct No. 20057103852, IFSC. MAHB0000041 या बँक खात्यावर आपली मदत गरजूंपर्यंत पोहोचवू शकतात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.