वाई : पुणे बंगळुर महामार्गावर पाचवड फाटा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून अनधिकृत रित्या शेतकरी आंदोलन व मेळावा आयोजित करून जाहीर सभा घेतल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
जून २०१७ मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर पाचवड (ता वाई) येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेश झुगारून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, तत्कालिन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आदींनी अडीचशे ते तीनशे लोकांचा जमाव अनधिकृतरित्या जमवून महामार्गावर रस्ता रोको करत जाहीर सभा घेतली. या प्रकरणी पोलिस नाईक धनाजी तानाजी कदम यांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या अनुषंगाने वाई न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी न्यायमूर्ती एम. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. ॲड. रवींद्र भोसले व संजय खडसरे यांनी आमदार शिंदे, पाटील, चव्हाण व नाईक निंबाळकर यांच्या वतीने तर ॲड. मिलिंद पांडकर, स्वाती जाधव यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. याकामी न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यात आले. आज अंतिम सुनावणी दरम्यान सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात सुनावणीसाठी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. सर्व आमदार न्यायालयात आल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.