मुंबई : विरार अग्नीकांडाची दुर्घटना ही नॅशनल न्यूज नाही, या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, आणखी किती बळी गेल्यावर नॅशनल न्यूज होईल, असा प्रतिहल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर चढविला आहे.
आज पहाटे विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत अतीदक्षता विभागातील अनेक कोविडचे रुग्ण होरपळून मरण पावले. मात्र यासंदर्भात टोपे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठाच वादंग झाला असून त्याबाबत दरेकर यांनी टोपे यांच्यावर कोरडे ओढले आहेत. विरारच्या घटनेबाबत बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी "ही काही नॅशनल न्यूज नाही", असे कथित वक्तव्य केल्याने समाज माध्यमांवर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
आज सकाळी घटनास्थळी गेलेल्या दरेकर यांनी याबाबत टोपे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. राजेश टोपे यांचे विधान बेजबाबदारपणाचेच नाही तर संतापजनक आहे, असे दरेकर म्हणाले. यांना जनतेचे आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवालही दरेकर यांनी विचारला. राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या असून ते बेताल बडबड करत आहेत.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी, जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य हे मंत्री करीत आहेत, असे कोरडेही दरेकर यांनी ओढले. यापूर्वीही राज्य सरकारमधील काही मान्यवर मंत्र्यांनी 'मुंबई जैसे शहरमे छोटे छोटे हादसे होतेही है', असे विधान अतिरेकी हल्ल्यासंदर्भात केल्याने मोठाच गदारोळ उठला होता. तर कसाब हल्ल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री आपल्या अभिनेता पुत्राला व चित्रपटसृष्टीशी संबंधित काहीजणांना घेऊन घटनास्थळावर गेल्यानेही त्यांच्यावर टीका झाली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.