कुडाळ (ता. जावळी) : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार यापुढे परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून जावळी तालुक्यात येण्यासाठी किमान ७२ तास अगोदर कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, असा आदेश प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी काढले आहेत.
जिल्ह्यासह जावळी तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे. हा संसर्ग वेळीच रोखणे आवश्यक असून, त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विविध निर्बंध घातले आहेत. आता प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी एका स्वतंत्र आदेशानुसार परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत.
कोरोना चाचणी न करता येणाऱ्यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करणे बंधनकारक आहे, तसेच चाचणी अहवाल येईपर्यंत त्यांनी विलगीकरण करून राहणे आवश्यक आहे. या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक दक्षता समिती अध्यक्ष यांनी करायची आहे.
शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे संभाव्य लॉकडाउनच्या भीतीने रोजीरोटीसाठी परमुलखात गेलेले जावळीतील लोक आपल्या गावी परतण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या शहरात कोरोना संसर्गाचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे शहरातून येणाऱ्या लोकांमुळे संसर्ग होऊन तालुक्यात संसर्ग साखळी वाढू नये, या उद्देशाने प्रांताधिकारी टोंपे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी कोविड टेस्ट अनिवार्य केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.