मुंबईला गेलेलं मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे : रामदास आठवले
सातारा : खराब वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आले नाही. पण मी गाडीतून आलेला असून माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. टेक्निकल अडचणीमुळे ते परत गेले असतील पण त्यांनी साताऱ्यातील नुकसानग्रस्त एका ठिकाणीतरी भेट द्यावी. त्यांचे मुंबईला परत गेलेलं हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे, असा सल्ला अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
वाई तालुक्यातील नुकसानीचा दौरा केल्यानंतर मंत्री रामदास आठवले आज सातारा शासकिय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा अपूर्ण राहिला मात्र, तुम्ही तुमचा दौरा पूर्ण केला, याप्रश्नावर त्यांनी दिलखुलास उत्तर दिले.
मंत्री आठवले म्हणाले, वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर आले नाही. पण मी गाडीतून आलेलो असल्याने माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. यामध्ये टेक्निकल अडचण असल्याने ते परत गेले असतील. पण, त्यांनी पुन्हा यावे, पाटण तालुक्यात मोठे नुकसान झालेले आहे. सातारा जिल्ह्यात त्यांनी एका ठिकाणीतरी त्यांनी भेट द्यावी. त्यांचे मुंबईला परत गेलेलं हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नद्या जोड प्रकल्प न केल्यामुळे ही पुरपरिस्थिती येत आहे का, याविषयी विचारले असता रामदास आठवले म्हणाले, मला खंडाळ्यातील काही लोकांनी धरणांचे पाणी मिळत नसल्याबाबतचे निवेदन दिले आहे. मुळात बारामतीला पाणी जाणे आवश्यक आहे, पण खंडाळ्यातही पाणी आले पाहिजे. यासंदर्भात मी जलसंपदा विभागाशी बोलणार असून लवकरच बैठकही घेणार आहे. बारामतीवर अन्याय करायचा नाही. कारण बारामतीने अनेकांना न्याय दिला आहे. खंडाळ्यालाही बारामतीने न्याय द्यावा, अशी आमची इच्छा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली योजनांची अंमलबजावणी झाली असती तर पूरपरिस्थिती उद्भवली नसती. यापुढेही याचा विचार राज्याने व केंद्राने करावा. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानमंत्री असताना नद्याजोड प्रकल्पासाठी एक लाख ३२ हजार कोटी रूपये मंजूर केले होते. नव्य मोदी सरकारनेही जलसंपदा विभागाबाबत चांगली भूमिका आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्त अंमलबजावणी होऊ शकले, यासाठी प्रयत्न करेन.
बारामतीने अनेकांना न्याय दिला, त्या यादीत तुम्ही आहात का, यावर प्रश्नावर ते म्हणाले, बारामतीने मला न्याय दिलेला आहे. मीही बारामतीला न्याय दिलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या पाठींब्यामुळे १९९० मध्ये मी मंत्री झालो. त्यावेळी काँग्रेसला सत्ता मिळाली होती. १४१ जागा आल्या होत्या. रिपाईचा पाठींबा मिळाला नसता भाजपचे सरकार सत्तेत आले असते. या बदल्यात मलाही मंत्रीपद मिळाले होते.
केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारात तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद का मिळाले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, मला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असते तर आनंद झाला असता. मी सध्या राज्यमंत्री आहे. लोकांना अपेक्षा असेल, पण, माझ्या पक्षाचे खासदार जास्त नाहीत. कॅबिनेटमंत्री पद मिळाले तर त्याचा फायदा भाजपला होणार आहे. नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भविष्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळेलही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.