बिजवडी (ता. माण) : राजकारणात कोणी तुमच्या मदतीला येईल असं गृहित धरून कधीच चालू नका. स्वत:च्या ताकदीवर राजकारण करायला शिकलं पाहिजे. या विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या मौलिक सल्ल्याची मी आजही जपणूक केलीय. शिस्तबध्द, मार्गदर्शक नेतृत्व आपल्यातून निघून गेलं आहे, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांना आदरांजली वाहिली.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, काका...म्हणजे जनसामान्यांशी नातं असणार मोठं नेतृत्व. सामान्य माणसाशी नाळ जोडून 35 वर्षे लोकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं. सहकार, राजकारण, समाजकारण या तिन्ही आघाड्यामध्ये त्यांनी जिल्हा व महाराष्ट्रात स्वत:ची अशी एक वेगळी छाप निर्माण केली होती.
शिस्तबध्द आयुष्य जगत राजकारणही शिस्तबध्द कस करावं व ते करत असताना सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून कसे पुढे जावे हे काकांकडून शिकण्यासारखं होतं. सुरूवातीच्या कालखंडात मला त्यांची चांगली साथ मिळाली. जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही सोबत लढलो. राजकारणात कोणी तुमच्या मदतीला येईल असं गृहित धरून कधीच चालू नका.
स्वत:च्या ताकदीवर राजकारण करायला शिकलं पाहिजे. या त्यांच्या मौलिक सल्ल्याची मी आजही जपणूक केलीय. असे हे शिस्तबध्द, मार्गदर्शक नेतृत्व आपल्यातून गेलंय. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच व महाराष्ट्राच मोठ नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांनी विलासकाकांना आदरांजली वाहिली.

