मुंबईकरांचा अन्नदाताच उपाशी; लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांचा पगार थकला

बारा महिने मुंबईकर नोकरदारांना जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचा रोजगार कोरोनाच्या फैलावामुळे बुडाला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सेवा बंद केल्यामुळे डबेवाल्यांना पूर्ण महिन्याचा पगारही मिळाला नाही
Mumbai Dabbawalas not getting Salary
Mumbai Dabbawalas not getting Salary

मुंबई  : बारा महिने मुंबईकर नोकरदारांना जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचा रोजगार कोरोनाच्या फैलावामुळे बुडाला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सेवा बंद केल्यामुळे डबेवाल्यांना पूर्ण महिन्याचा पगारही मिळाला नाही. त्यामुळे पुढे काय होणार, या चिंतेने डबेवाल्यांना ग्रासले आहे.

मुंबईतील बहुतेक डबेवाल्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यात आहे. शिधापत्रिका गावी असल्यामुळे डबेवाल्यांना मोफत धान्यवाटप सुविधेचा लाभ घेता येत नाही. रोजगार बंद असला, तरी लॉकडाऊनमुळे गावी जाता येत नाही. अशा परिस्थितीत काही संस्था डबेवाल्यांच्या कुटुंबांना शिधावाटप करत आहेत. कोरोनाचे अरिष्ट आणि लॉकडाऊन कधी संपेल, याबाबत काहीच सांगता येत नसल्याने पुढे कसे होणार, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

अनेक वसाहतींमध्ये प्रवेशालाही मनाई

लॉकडाऊन झाल्याने पूर्ण पगार मिळाला नाही. केवळ सात ग्राहकांनी आणि डबे मिळाले तेवढ्याच दिवसांचे पैसे दिले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक वसाहतींमध्ये प्रवेशाला मनाई असल्याने ग्राहकांकडे जाता येत नाही, असे मुलुंड येथील ज्ञानेश्‍वर कणसे म्हणाले. माहूर तालुक्‍यामधील मूळ गावातील घरी शिधापत्रिका असल्याने मोफत धान्याच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही. उद्या घरमालक भाडे मागायला आल्यास काय करायचे? माझ्या कुटुंबात चार सदस्य आहेत. कोरोनामुळे आमच्यावर फार बिकट परिस्थिती ओढवली आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली.

भेडसावताहेत अनेक समस्या

पुणे जिल्ह्यातील गावात शिधापत्रिका असल्याचे अंधेरी येथील रोहिदास सावंत यांनी सांगितले. घरातील धान्य संपले आहे. पूर्वी मिळालेल्या पैशांतून सध्या उदरनिर्वाह सुरू आहे. हे पैसे किती दिवस पुरणार, याची सतत चिंता लागलेली असते. या महिन्याचा पगारही पूर्ण मिळाला नाही. घराचे भाडे भरायचे आहे. हा भार कसा पेलायचा, असा खिन्न सवाल त्यांनी केला.

राज्य सरकारने शिधापत्रिकेची अट डबेवाल्यांसाठी शिथिल करावी. त्यांना शिधावाटप केंद्रांतून कमी दरांत अन्नधान्य द्यावे. अनेक डबेवाल्यांच्या शिधापत्रिका मूळ गावी असल्याने त्यांना या संकटाच्या काळात मदतीची गरज आहे. राज्य सरकारने त्यांना मदत करावी, अशी विनंती - सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन.

हे देखिल वाचा - साडेतीन कोटी कामगारांचे हातावरील पोट उपाशी

केंद्राच्या गरीब कल्याण पॅकेजमधून महाराष्ट्रातील एकाही कामगारांना अद्याप दमडाही मिळाला नाही. मात्र, लॉकडाउन काळातील कामगारांच्या अडचणी जाणून आता राज्य सरकार राज्यातील 12 लाख नोंदणीकृत कामगारांनाच दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार आहे. हातावरील पोट असलेले राज्यात तब्बल तीन कोटी 65 लाख असंघटित कामगार असून लॉकडाउनमुळे त्यांच्या हातातील काम गेल्याने त्यांना आता पोटाचा प्रश्‍न सतावू लागला आहे....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com