पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील महत्वाच्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील महत्वाच्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अर्थतज्ज्ञांची मते जाणून घेतली. निमित्त होते निती आयोगाने रोजगारवृद्धी, कृषी विकास जलसंपदा, निर्यात, शिक्षण, आरोग्य या विषयांवर बोलावलेल्या बैठकीचे. देशभरातील 40 हून अधिक अर्थतज्ज्ञ यात सहभागी झाले होते. 

भविष्यकालीन आर्थिक धोरणावर चर्चा करण्यासाठी निती आयोगाने "इकॉनॉमिक पॉलिसी - द रोड अहेड' या कार्यक्रमांतर्गत बोलावलेल्या 
अर्थतज्ज्ञांच्या बैठकीत वेगवेगळ्या सूचना आणि अभिप्रायांचे आदान प्रदान झाले. यामध्ये 40 हून अधिक अर्थतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञमंडळी सहभागी झाले होते. अर्थव्यवस्थेचा विकास आणि रोजगार वृद्धी, कृषी, जलसंपदा, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या मुद्‌द्‌यांवर अर्थतज्ज्ञांची गटनिहाय चर्चा होऊन सूचना मांडण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यात हजेरी लावून तज्ज्ञांच्या सुचना ऐकून घेतल्या आणि तज्ज्ञांचे आभार मानले. रेल्वेमंत्री पीयुष गोयल, सांख्यिकी आणि नियोजन मंत्री राव इंद्रजीत सिंह, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यासोबतच सरकारमधील तसेच निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

सरकारच्या नव्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प पाच जुलैला मांडला जाणार असून अर्थसंकल्प छपाईची प्रक्रिया प्रारंभ होण्याचे प्रतिक असलेला "हलवा समारंभ' आज "अर्थमंत्रालयात पार पडला आहे. यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून उद्योग, कृषीसह वेगवेगळ्या क्षेत्रांच्या त्याचप्रमाणे राज्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. मात्र, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. घटलेले औद्योगिक उत्पादन, वाहन उद्योगाची अस्वस्थता, प्रमुख राज्यांमध्ये दुष्काळाचे असलेले संकट, कृषी क्षेत्राची चिंता यावर अर्थसंकल्पातून सरकार कसा दिलासा देईल याकडे लक्ष लागले आहे. 

याशिवाय, नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पाचव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरची बनविण्याचे आव्हान असल्याचे म्हटले होते. सोबतच परिषदेने आर्थिक विकासाबरोबरच देशातील दुष्काळी परिस्थिती, कृषी क्षेत्राची चिंता, पावसाचे पाणी साठविणे यावर प्रदीर्घ चर्चा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर निती आयोगाची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com