फडणवीस - मोदी भेटीत मध्यरात्री ठरले होते हे 'ऑपरेशन' 

शिवसेनेला दूर ठेवायचे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण जी पर्यायी योजना सादर करू त्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला होता.
Fadanvis Ajitdada
Fadanvis Ajitdada

मुंबई :  शिवसेनेने परजलेली नाराजीची तलवार म्यान होत नाही, हे दिसल्याने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमक नेते अजित पवार यांच्याशी गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेले संबंध लक्षात घेत बुधवारी (ता. 20) रात्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री उशिरा दिल्ली गाठून सरकार स्थापनेसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती.

शिवसेना आपली वैचारिक सहप्रवासी असल्याने त्यांना राजी करण्याचा प्रयत्न करणार काय, असा प्रश्‍न या वेळी त्यांना विचारला होता, असे समजते.

'सामना'तील अग्रलेखातून सतत होणारी टीका, 'चायवाला', 'उपरे' असे शब्द झेलत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीचा विचार करायचा काय? अशी विचारणा फडणवीस यांनी पंतप्रधानांना केली होती. 105 जागा निवडून आल्यानंतर सरकार स्थापन न करणे म्हणजे जनादेशाचा अवमान होईल, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला स्मरून परत यावे, अशी विनंती करण्याची तयारी असली; तरी ते दूरध्वनीलाही प्रतिसाद देत नाहीत, असे लक्षात आल्याने आता पर्यायी व्यवस्था तयार करावी काय? असा प्रस्ताव मांडला गेला.

यावर भाजपच्या प्रतिष्ठेला कुठेही डाग लागणार नाही अशा रितीने हे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली. जनादेशाचा आदर करण्यासाठी सरकार स्थापन करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणण्याचे त्याच दिवशी ठरले, असे मानले जाते.

मुंबईला परत आल्यावर सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली असावी, असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी गृहमंत्री व पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली होती. आज पहाटे राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. अजित पवार यांनी विधिमंडळ पक्षनेता या पदामुळे भाजपला पाठिंबा देणारे पत्र सादर केले.

निवडून आलेल्या विधिमंडळ पक्षनेत्याला पदावरून बाजूला करणे, हे आजवरच्या निवाड्यांनुसार अवैध ठरले आहे. त्याच नियमाचा आधार घेत आता विधिमंडळात विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्याची अपेक्षा भाजप बाळगून आहे.

शिवसेनेला दूर ठेवायचे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण जी पर्यायी योजना सादर करू त्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला होता. तो प्राप्त परिस्थितीत भाजपने स्वीकारला. आता यासंबंधात पुढे काय होते, याबद्दल उत्सुकता आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com