औरंगाबादेतील जुन्या मनसैनिकांची घरवापसी...

 औरंगाबादेतील जुन्या मनसैनिकांची घरवापसी...

औरंगाबाद : स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अन्याय केला जातो, विश्‍वासात घेतले जात नाही, पक्षही तक्रारीची दखल घेत नाही असे म्हणत बाहेर पडलेल्या अनेक जुन्या मनसैनिकांनी घरवापसी केली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य विजय चव्हाण, मनसेचे त्यावेळेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी त्यापैकी दोन नावे. चव्हाण यांनी पैठण विधानसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर संदीप कुलकर्णी भाजपमध्ये गेले होते. 

राज्यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तेच सत्तेवर येणार हे गृहित धरून अनेक राजकीय पक्षातील मोठ्या नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. पण शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. सत्तेसाठी शिवसेनेने देखील सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारत काही मुद्यावर तडजोडीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मोठ्या नेत्यांची अडचण झाली, पण मनसे सारख्या पक्षातील छोट्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मात्र घरवापसीची तयारी सुरू केली. औरंगाबाद मनसेत गेल्या वर्ष-दीड वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. 

मनसेच्या पदाधिकाऱ्याने स्थानिक नेत्यांवर आरोप करत आत्महत्येचा केलेला प्रयत्न, लोकसभा निवडणुकीत पक्षादेश डावलून आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारी, वरिष्ठांकडून न घेतलेली दखल आणि विश्‍वासात न घेता मनमानी पध्दतीने हाकला जात असलेला कारभार अशा अनेक तक्रारी या काळात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कुणी वंचित आघाडीत तर कुणी भाजपमध्ये गेले होते. 

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतरही भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले, तर वंचित बहुजन आघाडीचा प्रभावच दिसला नाही. तिकडे सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका राज्यभरातून होऊ लागताच, मनसेने हाच मुद्दा घेऊन नव्याने पक्ष बांधणी सुरू केली. अगदी भूमिका आणि झेंडा बदलण्याच्या हालचाली देखील युध्दपातळीवर सुरू झाल्या. शिवसेनेने केलेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी नव्या मित्राच्या शोधात असलेल्या भाजपने देखील मनसेला साद घातली. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीतून एक सूचक इशारा देण्यात या नेत्यांना यश आले. आता 23 जानेवारी रोजी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनातून नव्या राजकीय समीकरणांना सुरूवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतील नाराज आणि आपल्या पक्षातून निवडणुकीच्या काळात बोहर गेलेल्यांसाठी मनसेने पायघड्या अंथरल्याचे चित्र आहे. 
शिवसेना टार्गेट.. 
शिवसेनेतील नाराज गट हे मनसेचे टार्गेट असल्याचे बोलले जाते. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे हे दोन मोठे मासे मनसेच्या गळाला लागले आहेत. एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे यांनी या दोघांनाही हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जाते. या शिवाय शिवसेनेचे काही विद्यमान नगरसेवक देखील मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com