आमदार सुनील शेळके : आमदारकीचे पहिलंच पाऊल दमदार व विक्रमी 

पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे आमदारकीचे पहिलंच पाऊल दमदार व विक्रमी पडले.दमदार कामं व दमदार विजय आणि शेळके हे एक समीकरणच झालेले आहे. पहिल्यांदा नगरसेवक म्हणून २०११ ला विक्रमी मतांनी निवडून आलेल्या शेळकेंनी तो रेकॉर्ड आमदारकीलाही २०१९ ला कायम ठेवला.
आमदार सुनील शेळके : आमदारकीचे पहिलंच पाऊल दमदार व विक्रमी 

मावळातून ते ९४ हजाराच्या लीडने गेल्या महिन्यात निवडून आले. एवढ्या मताधिक्याने मावळात प्रथमच आमदार निवडून आला आहे.राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनाच त्यांनी धूळ चारली. एवढेच नाही,तर त्यांची हॅटट्रिकही हुकवली.अशा रितीने आमदारकीचे त्यांचे पहिलेच पाऊल विक्रमी ठरले आहे.

राष्ट्रवादीत औपचारिक प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती, हे आणखी एक वेगळेपण. तेच नव्हे, तर त्यांच्या गेल्या चार पिढ्या या जनसंघ व भाजपशीच एकनिष्ठ होत्या. केलेल्या कामाच्या जोरावर विधानसभेला संधी मिळेल,असा त्यांना ठाम विश्वास होता.मात्र,तसे झाले नाही. त्यामुळे दुखावले जाऊन त्यांनी ऐनवेळी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश केला. एवढेच नाही,तर दणदणीत विजयही मिळवला.

मतदारसंघ तथा मावळ तालुका राज्यात आदर्श करणार असल्याचे त्यांनी सरकारनामाला सांगितले. त्यासाठी प्रथम मावळ खड्डेमुक्तीला ते सुरवात करणार आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या तालुक्यात पर्यटनाला अधिक चालनाही ते देणार आहेत. त्यातून रोजगारालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले

.एमआयडीसीत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्नही त्यांना मार्गी लावायचा आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याने त्यांनी दादागिरीला जुमानले नाही,असे त्यांनी आपल्या विजयाचे गणित मांडले.

शेळके यांना राजकीय वारसा आहे. म्हणून राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.तरी,त्यांचा राजकारण प्रवेश हा समाजकारणातून झाला. त्यांच्या पणजी तान्हाबाई शेळके या तळेगावच्या जनसंघाच्या पहिल्या बिनविरोध निवड झालेल्या नगरसेविका होत्या.त्यांचे आजोबा बाळासाहेब हे नगरसेवक व नगराध्यक्षही होते. तर,काका भिमाजी हे ही नगरसेवक होते.

त्यांचे मोठे बंधू सचिन यांनी व त्यानंतर सुनील शेळकेंनी हा वारसा पुढे चालवला. २००४ ला ते भाजपचे क्रियाशील सदस्य झाले. त्यापूर्वी दहा वर्षे त्यांनी समाजसेवा केली. २०११ ला ते प्रचंड मतांनी पहिल्यांदा तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक झाले. नंतर ते भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 

२०१६ ला ते पुन्हा ते पुन्हा निवडून आले.एवढेच नाही,तर नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवकांनाही निवडून आणले.दरम्यान,त्यांनी स्वखर्चातून गटारे केली.सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसवले.गरजूंना स्वखर्चातून मदत व बेघरांना घरे बांधून दिली.शिक्षणासाठी काही किलोमीटरची पायपीट करणाऱ्या दीड हजार मुलींना सायकली दिल्या.गावागावात विकासाची गंगा पोचविण्याचा प्रयत्न केला. 

आमदार होण्यापूर्वीच आंदर मावळातील दोन दुर्गम गावे त्यांनी दत्तक घेतली. त्यांचा अल्पावधीत कायापालटही केला.याच विकासकामाच्या जोरावर विधानसभा लढण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी तयारी सुरु केली.

निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळण्याअगोदरच अगोदरच त्यांनी गावभेट दौरे सुरु केले. तिकिट मिळेल,अशी त्यांना खात्री होती. मात्र, तसे झाले नाही.तरीही ते निवडणूक लढले. जिंकले सुद्धा. कार्यकर्त्त्यांचे मोठे मोहोळ त्यांच्याकडे आहे. त्या जोरावर व जनतेच्या साथीने आमदारकीच्या पहिल्याच पावलात (टर्ममध्ये) मावळचा कायापालट करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com