अकोला : अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी दोन महिन्यांत 35 मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण विधानसभेत मांडले होते. त्यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित करून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे लक्ष वेधले होते. सोबतच राज्यातील महिला-मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना बघता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली केली.
मानवी तस्करीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2019 मधील अहवालाने स्पष्ट झाले आहे. यात महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वर्ष 2019 मध्ये विदर्भातील सहा जिल्ह्यांतून 1 ते 35 वयोगटातील 926 मुली बेपत्ता झाल्या आहे. नागपूर, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा असे हे सहा जिल्हे आहेत.
एक अल्पवयीन मुलगी हरविल्याची नोंद मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या प्रकरणात तेथील तपास अधिकाऱ्यांनी गतीने तपास केला नाही. पालकांना अतिशय अवमानजनक वागणूक दिली. मुलीच्या काळजीमुळे पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करुन कडक शब्दात ताशेरे ओढले. काल मुलीच्या पालकांनी मंत्रालयात गृहमंत्र्यांना भेटून मुलीच्या तपास प्रकरणातील पोलीसांबाबत तक्रार केली. त्यावर गृहमंत्र्यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन आणि विभागाच्या अपर मुख्य सचिवांना बोलावून चर्चा केली.
गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि तसे सभागृहात जाहीर केले. महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा राज्यात खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली केली. सिव्हिल लाईनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय श्रीमती कराळे यांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.