पाच दिवसांच्या आठवड्यावरुन कर्मचाऱ्यांमध्येही खदखद 

mix reaction on five days week
mix reaction on five days week

नागपूर : पाच दिवसांच्या आठवड्याने कर्मचाऱ्यांमध्येच आता मतभेद होऊ लागले आहेत. सरसकट सर्वच विभागांना हा निर्णय लागू होणार नाही. मात्र, ठरल्यानुसार सर्वांनाच सुमारे पाऊण तास जादा काम करावे लागणार आहे. एकाला शनिवारची सुटी तर दुसरा कामावर, सोबतच जादा तास कामही करावे लागणार असल्याने दिवसेंदिवस खदखद वाढत चालली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केली आहे. एक मार्चपासून याची अंमलबजावणी होणार आहे. याकरिता कर्मचाऱ्यांना सुमारे पाऊण तास जादा काम करावे लागणार आहे. सध्या 10 ते 5.45 कामाची वेळ आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यावर ही वेळ वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी राहणार आहे. जेवणाची सुटी अर्धा तासाची मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. आता ज्यांना सुटी लागू होणार नाही, त्यांनाही याच वेळेप्रमाणे यावे लागणार आहे. आधीच शासकीय कार्यालयांमध्ये वेळेत कामे होत नाहीत. कर्मचारी जागेवर राहत नाही, अशी सर्वांचीच ओरड आहे. वेळेत कामेही केली जात नाहीत. पाच दिवसांच्या आठवड्याच्या निर्णयाने कामे आणखी रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सामान्य नागरिकांच्या कामावर परिणाम होता कामा नये म्हणून कामाचे तास वाढविण्यात येणार आहेत, असे सांगितले जात असले तरी त्याची अंमलबजावणी कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित होतो. आपत्ती, आरोग्य व महत्त्वाच्या विभागांना पाच दिवसांच्या आठवड्यातून वगळण्यात आले आहे. शासनाने सर्वांचा विचार करून आदेश काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे. अनेक दिवसांची मागणी होती. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. शिवाय विजेचीही बचत होईल.
- सोहन चवरे, अध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जि. प. नागपूर

कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. कामाची वेळ वाढविल्याने शासकीय कामांचा तातडीने निपटारा हाईल.
- सुशील शिंदे, विभागीय सचिव, समाजकल्याण कर्मचारी संघटना

हा निर्णय योग्य नाही. काम करणाऱ्यांवर बोझा वाढणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आठ तास कामाच्या निर्णयाचेही उल्लंघन आहे. सरकारने आदेश काढताना याचाही विचार करावा.
- सिद्धार्थ उके, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ.

सरकाने जुनी पेन्शन योजनेचाही विचार करावा. त्याचप्रमाणे हा निर्णय सर्वच कर्मचाऱ्यांसाठी लागू करावा.
-राज ढोमणे, नागपूर जिल्हा तृतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटना. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com