औसा : विरोधी पक्षात असतांना याच सत्ताधारी मंडळींनी आमच्यावर खोटी टीका करीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' असा प्रश्न उपस्थित केला होता. पण या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आमच्या काळात प्रगतीपथावर असणारा महाराष्ट्रच आता दिसत नसल्याची टीका औसा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी फडणवीस सरकारवर केली.
बुधवारी (ता.16) निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उस्तुरी या गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी पाटील आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या काळातील प्रगत महाराष्ट्राची तुलना आताच्या सरकारच्या काळाशी केली. बसवराज पाटील म्हणाले, ''गेल्या दहा वर्षात जे करण्यासारखे आहे त्यावरच बोललो, आणि जे बोललो ते करूनही दाखविले. रस्ते, पाणी, गावोगावी समाजमंदिरे, बंद कारखाने सुरू करून उस उत्पादकांना चांगला भाव दिला. मात्र दुसरीकडे काहीही कामे न करता फक्त पोस्टरबाज आणि खोट्या आश्वासनांची खैरात सत्ताधारी पक्षाकडून जनतेला दिली जात आहे. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचे उत्तर देखील सत्ताधाऱ्यांकडे नाही.''
''मुख्यमंत्री पदावरचा जबाबदार माणूस तालुक्यात येतो आणि येथील दुष्काळ, पाणी, विमा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या गंभीर समस्यांवर न बोलता आम्हाला निवडून द्या म्हणतो. अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देणार का,'' असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थितांना केला. ''केवळ आश्वासने देऊन निघून जातात यावरूनच या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही हे लक्षात येते. हे सरकार सर्वच आघाड्यावरअपयशी ठरले असून आता यांना मतदार पायउतार केल्याशिवाय राहणार नाहीत,'' असा विश्वास देखील बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.