संजय मंडलिकांपेक्षा सतेज-मुश्रीफ यांनाच घाई 

आगामी लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेकडूनच लढवणार, असे एकदा नव्हे तर अनेकदा प्रा. संजय मंडलिक यांनी जाहीर करूनही काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मात्र प्रा. मंडलिक यांनाच खासदार करण्याची घाई झाली आहे. व्यक्तीद्वेषापोटी स्वतःचे राजकारण टिकवण्याची सुरू असलेली धडपड चर्चेचा विषय ठरली आहे.
संजय मंडलिकांपेक्षा सतेज-मुश्रीफ यांनाच घाई 

कोल्हापूर : आगामी लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेकडूनच लढवणार, असे एकदा नव्हे तर अनेकदा प्रा. संजय मंडलिक यांनी जाहीर करूनही काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मात्र प्रा. मंडलिक यांनाच खासदार करण्याची घाई झाली आहे. व्यक्तीद्वेषापोटी स्वतःचे राजकारण टिकवण्याची सुरू असलेली धडपड चर्चेचा विषय ठरली आहे. 

सतेज पाटील-मुश्रीफ या जोडीचे महाडीक आणि कंपनी हा राजकीय शत्रु आहे. पाटील यांना 'दक्षिण' चा बदला घ्यायचा आहे तर कागलमध्ये महाडीक यांनी मुश्रीफ यांच्याविरोधाच मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा महाडीकांवर राग आहे. मुश्रीफ यांच्या प्रयत्नामुळे धनंजय महाडीक हे खासदार झाले, पण त्यांनी नंतर मुश्रीफ यांनाच ठेंगा दाखवला, त्यांचे नेतृत्त्व मान्य केले नाही हाही राग मुश्रीफ यांना आहे. 

दुसरीकडे ज्यांना हे दोघे खासदार करणार म्हणतात त्या प्रा. मंडलिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत कधीही सुतोवाच केलेले नाही, याबाबतचे संकेतही त्यांनी दिलेले नाहीत. उलट शिवसेनेकडूच आपण लढणार हे त्यांनी ठोसपणे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रा. मंडलिक हे कुठल्याही पक्षाचे उमेदवार असले तरी हे दोघे त्यांना पाठिंबा देणार का ? शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होणार का ? असे प्रश्‍न उपस्थित होतात. 

खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगलेत कोणी लढायला तयार नाही हे चाचपणी केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यातून दोन्ही काँग्रेसला ही जागा सोडून देण्याची वेळ आली आहे. माजी खासदार कल्लाप्पा आवाडे हेच शेट्टी यांच्याविरोधात लढू शकतात, त्यातून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली, पण ही घडामोडही पुढे गेली नाही. हाच कित्ता कोल्हापूर लोकसभा मतदार संघात गिरवला जात आहे. प्रा. मंडलिक हे शिवसेनेचेच उमेदवार राहीले तर राष्ट्रवादी कोल्हापुरवरील हक्क सोडणार का? त्यातून राष्ट्रवादीला काय मिळवणार? हे प्रश्‍न आहेतच. 

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांनीही आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही, पण पुढचा खासदार मीच असणार असे ते सांगतात. मुश्रीफांना मी नको असेल तर बघू, अशी त्यांची भुमिका आहे. पक्षाच्या पातळीवर स्पष्टता तर नाहीच उलट पक्षश्रेष्ठींनीही महाडीक यांच्या विरोधात कधी भाष्य केलेले नाही. आपल्याला जे वातावरण हवे ते तयार करायचे हे सतेज-मुश्रीफ यांचे वैशिष्ट्य आहे, पण त्याला पक्षश्रेष्ठींची मान्यता मिळेल असे नाही. व्यक्तीगत राजकारणासाठी हा खटाटोप सुरू असताना पक्षीय पातळीवरील धोरणे स्थानिक पातळीवर जाहीर करून संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. 

डिसेंबर 2018 मध्ये चार राज्यातील विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर निवडणुकीला केवळ सात-आठ महिन्यांचा कालावधी उरतो, तरीही राष्ट्रवादीत उमेदवारीबाबत स्पष्टता नसेल तर हा राजकीय विनोद म्हणावा लागेल. काँग्रेसमध्ये पी. एन. पाटील जिल्हाध्यक्ष असले तरी सतेज पाटील हेच नेते म्हणून वावरत आहेत. पक्षाचा एकही आमदार नाही, खासदार नाही, अपवाद वगळता कोठेही सत्ता नाही, अशा परिस्थितीत सत्ता बदलण्याची स्वप्ने बघणे किती योग्य आहे. व्यक्तीगत द्वेष आणि आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी सुरू झालेली ही धडपड त्यासाठी पक्षाला बळी देण्याचा प्रकार सुरू आहे. 

मग ए. वाय. यांना काय म्हणणार
राष्ट्रवादीच्या पातळीवर उमेदवारीबाबत स्पष्टता नाही, विद्यमान खासदारांनीही काही संकेत दिले नाहीत, दुसरीकडे मुश्रीफ हे खासदारांना नावे ठेवत असतील तर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी इशाराच दिला आहे, त्यांना काय म्हणणार. मध्यंतरी मुश्रीफ असतील किंवा राष्ट्रवादीचे अन्य नेते, यांच्याकडून मी म्हणेल तसेच सुरू आहे. त्यातून पक्षाची स्थिती प्रायव्हेट लिमिटेडसारखी झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळी जिल्ह्यात पाच ते सहा आमदार, 'गोकुळ' वगळता इतरत्र जिल्हा बॅंक, जिल्हा परिषदेसह बहुंताशी नगरपालिका व पंचायत समितीत पक्षाची सत्ता पोहचली. पण आजपर्यंत राष्ट्रवादी दोन आमदारांवरच आहे. पक्ष संघटनना मजबूत असावी लागते, त्यादृष्टीने प्रोढत्त्व घेऊन काम करावे लागते तसे होताना दिसत नाही. 

पुन्हा 2009 चाच खेळ
विद्यमान खासदार नको, स्वतःची लोकसभा लढवण्याची इच्छा नाही. त्यातून ओढून आणून दुसऱ्याला उमेदवारी देऊन पुन्हा 2009 चा खेळ मांडला जात आहे. गंमतीचा भाग असा 2009 ला तो मंडलिंकासाठी मांडला, आता तो महाडीकांसाठी मांडला जातोय आणि त्यासाठी पुन्हा मंडलिकांच्या वारसांनाच पुढे केले जात आहे. त्यातून 2009 ला पक्षाला पराभव सहन करावा लागला. आताही या घडामोडी करत असताना पक्षाचा म्हणून विचार झाला असे वाटत नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com