नागपूर : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारमध्ये कोणताही गुणात्मक फरक नाही. दोन्ही सरकारे एकसारखेच असल्याचे मत भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले आहे.
नागपुरात एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गाणार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी लोकांचे काम करणे कठीण असल्याची कबुली दिली. एखादा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनेक टेबलांवरून फाईल फिरवावी लागते. यात बराच कालावधी वाया जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आल्यानंतर या चौकटीमध्ये काही बदल होईल, असा विश्वास होता. लोकांची कामे तात्काळ मार्गी लागतील, असे वाटत होते. परंतु, यात कोणताही बदल झाला नाही." फडणवीस यांच्यापूर्वी राज्यात आघाडीचे सरकारचे नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण करीत होते. त्या सरकारमध्ये व फडणवीस सरकारमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे माझ्या लक्षात आल्याचे आमदार गाणार यांनी सांगितले.
नागो गाणार नागपूर विभागातून शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्वासातील म्हणून आमदार गाणार ओळखले जातात. आमदार गाणार यांनी यापूर्वीही राज्य सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन वेळेत होत नसल्याने आमदार गाणार यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.