आमदार कोल्हे यांनीच शेतकरी संपामध्ये खोडा घातला : आशुतोष काळे

राज्यातील शेतकरी संप आणखी दोन दिवस चालला असता, तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली असती. मात्र, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संप मोडीत काढला, असा दावा करत सरसकट कर्जमाफी न मिळण्यास आमदार कोल्हेच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी येथे केला.
आमदार कोल्हे यांनीच शेतकरी संपामध्ये खोडा घातला : आशुतोष काळे

नगर : राज्यातील शेतकरी संप आणखी दोन दिवस चालला असता, तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली असती. मात्र, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संप मोडीत काढला, असा दावा करत सरसकट कर्जमाफी न मिळण्यास आमदार कोल्हेच जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी येथे केला.

कोपरगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचा पुतळा जाळण्यासाठी घेवून जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवल्यावर तेथे दोन गटांत मारहाण झाली. आमदार कोल्हे व काळे यांच्या गटात झालेल्या या मारहाणीबाबत दोन्ही बाजुंनी गुन्हे दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना आशुतोष काळे यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप खोडून काढताना काळे यांनी कोल्हे यांच्यावर पलटवार केला.

काळे म्हणाले, ''आपण आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर पातळी ओलांडून कोणतेही आरोप केले नाहीत. मात्र, महिला आमदार असल्याचे पांघरून ओढून त्या समस्यांना बगल देत असतात, हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे." कोल्हे कुटुंबीय मला मुलगा मानतात, असे त्या म्हणत असतील, तर मुलाचा पुतळा जाळण्यासाठी जगात कोणती आई परवानगी देईल का, असा सवालही त्यांनी केला.

''तालुक्याचा विकास केला म्हणतात, शंभर दिवसांत शंभर कोटींचा निधी आणल्याचे आमदार कोल्हे सांगतात, मग हे शंभर कोटी कुठे खर्च केले हे त्यांनी सांगावे. राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन व त्याला झालेली गर्दी आमदार कोल्हे यांच्या डोळ्यात खुपली. त्यामुळे त्यांनी सभेनंतर काहीतरी कुरापत काढली. आमच्या कार्यकर्त्यांनी खोटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल केले,'' असा आरोप काळे यांनी केला.

विकास दाखवा, अन्यथा पैसे दाखवा
तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये आणल्याचे तालुक्याचे आमदार सांगतात, मग हे पैसे गेले कुठे. त्यांनी एक तर विकास दाखवावा, किंवा पैसे कुठे गेले ते तरी दाखवावे, असे आवाहन करून आशुतोष काळे म्हणाले, "जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षांची चिंध्या करण्याबाबतची पोस्ट विरोधक जनतेला दाखवित आहेत. पण अशा प्रकारची कुठलीही पोस्ट आमच्या कार्यकर्त्यांनी टाकलेली नाही. मात्र, मूळ समस्येपासून बगल देण्यासाठी ही त्यांची नवीन क्लुप्ती आहे," 

आशुतोष काळे यांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग
(कै.) शंकरराव काळे यांची संस्कृती, स्वभाव सर्व पक्षातील राज्यभरातील नेत्यांना माहित आहे. माजी आमदार अशोक काळे यांनी दोन वेळा बिपीन कोल्हे यांचा पराभव करून तालुक्याच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. आपणही २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव करून तालुक्याचा विकास करू, असा मनोदय आशुतोष काळे यांनी व्यक्त करून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिट वाटपाचा विषय अद्याप चर्चिला जात नसला तरीही आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष घोषित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com