मंत्रालयात आता सतत वर्दळ, मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने आठवडाभर पूर्ण कामकाज

  मंत्रालयात आता सतत वर्दळ, मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने आठवडाभर पूर्ण कामकाज

मुंबई : राज्याला गेल्या 25 वर्षांनंतर मुंबईतील मुख्यमंत्री लाभल्याने मंत्रालय आता आठवडाभर कार्यरत राहणार आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर मनोहर जोशी विराजमान झाले होते. जोशी यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील असले, तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द मुंबईत राहिल्याने ते मुंबईचे मुख्यमंत्री असल्याचे मानले जात होते. युतीच्या सत्तेत शेवटच्या सहा महिन्यांसाठी जोशी यांच्याऐवजी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आहेत आणि आजपर्यंत त्यांनी ग्रामीण भागाची नाळ सोडलेली नाही. 

राज्यात 1999 मध्ये सत्तांतर झाले आणि कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली. आघाडीच्या 15 वर्षांच्या सत्तेत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. विलासराव देशमुख हे लातूरचे, शिंदे सोलापूर येथील, अशोक चव्हाण नांदेडचे आणि पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड येथील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा कारभार करताना या माजी मुख्यमंत्र्यांनी आपला मूळ मतदारसंघ किंवा जिल्ह्याशी असलेला संपर्क कायम ठेवला होता. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांना मंत्रालय, मूळ जिल्हा आणि मुख्यमंत्री या नात्याने राज्यभरातील पक्षीय आणि शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी त्यांना राज्यभर दौरे करावे लागत होते. 

आघाडीच्या काळात आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री मंगळवार, बुधवार आणि जास्तीत जास्त गुरुवार आणि अपवादात्मक परिस्थितीत शुक्रवारपर्यंत एक-दोन मंत्री उपस्थित राहत असे. म्हणजेच, मंत्री आठवड्यातील सरासरी तीन दिवस मंत्रालयात उपस्थित असत. अन्य दिवशी मुख्यमंत्री किंवा मंत्री उपस्थित नसल्याने मंत्रालयातील कामकाज अत्यंत संथ गतीने होत होते. त्यामुळे मंत्रालयातील वर्दळही तीन दिवस वगळता अन्य दिवशी रोडावलेली असे. 

युतीचे सरकार 2014 मध्ये पुन्हा सत्तेवर आले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस नागपूर येथील असल्याने त्यांना अनेकदा नागपूर, विदर्भ आणि राज्यभरात दौरे करावे लागत होते. फडणवीस यांच्या कालखंडात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होत असे. त्यामुळे बुधवारपासूनच मंत्रालय ओस पडत असल्याचे पाच वर्षे चित्र होते. 
शपथविधीनंतर ठाकरेंची रोज उपस्थिती 
आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील आहेत. त्यामुळे आठवडाभर मंत्रालय कार्यरत राहण्याची शक्‍यता आहे. 28 नोव्हेंबर रोजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते दररोज मंत्रालयात उपस्थित राहत आहेत. ठाकरे सरकारने बुधवारी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा पायंडा पाडला आहे. अपवादात्मक परिस्थितीत कधीतरी एक-दोन दिवस वगळता उद्धव ठाकरे मंत्रालयात येणार असल्याने आठवडाभर मंत्रालय कार्यरत राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com