'सौ. गृहमंत्र्यां'चा फोन येतो तेव्हा अनावर होतात भावना...!

पोलिसांच्या 'होम डिपार्टमेंट'चे मनोबल कायम राखण्याचा प्रयत्न आरती देशमुख नेटाने करत आहेत.
aarati-anil-deshmukh
aarati-anil-deshmukh

पुणे : हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी.'' असा फोन येतो तेव्हा फोनच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या महिलेचा पहिल्यांदा त्यावर विश्वासच बसत नाही. पण स्वतः सौ गृहमंत्रीच बोलत असतात. त्या अगदी घरातल्या आईच्या मायेने चौकशी करु लागतात. ''कशा आहात, काळजी घ्या, काही लागलं तर सांगा!'' एवढ्या आपुलकीनं विचारपूस झाल्यानंतर भावना अनावर होऊन समोरुन हुंदका फुटतो. 

असा प्रसंग दररोज महाराष्ट्रात घडतोय. होय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती या स्वतः दररोज राज्यातल्या किमान पंधरा-वीस पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नीला फोन लावतात. त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना धीर देतात. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्यानंतर सर्वाधिक ताण सध्या राज्याच्या पोलिस दलावर आहे. दिवस-रात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वात मोठा आहे. यातूनच तब्बल 87 पोलिसांचा राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शेकडो जण बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या 'होम डिपार्टमेंट'चे मनोबल कायम राखण्याचा प्रयत्न आरती देशमुख नेटाने करत आहेत.

आरती देशमुख यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की, राज्याचे गृहमंत्री म्हणून हे स्वतः गेल्या तीन महिन्यात पायाला भिंगरी लावल्यासारखे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी पोलिसदलाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसभर शेकडो लोकांना ते भेटतात. तेव्हा माझ्या मनात त्यांच्याबद्दलची काळजी असते. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरी असणारी त्यांची पत्नी, मुलं-बाळं यांची भावना देखील माझ्यासारखीच असणार. त्यांनाही किती काळजी वाटत असेल, धास्ती वाटत असेल या भावनेतूनच मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. 

मी जेव्हा फोन करते तेव्हा पहिल्यांदा तर त्यांचा विश्वास बसत नाही. नंतर बऱ्याचजणींना रडू कोसळतं. त्यांच्या पतीबद्दलची काळजी त्या व्यक्त करतात. ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी मुलं त्यांच्याकडे झेपावतात पण आंघोळ केल्याशिवाय त्यांना स्पर्शही करता येत नाही. ड्युटीवर असताना त्यांना कुठून संसर्ग होईल का ही भीती त्यांना वाटत राहते. गृहमंत्र्यांची पत्नी या नात्याने मी त्यांना दिलासा देते. सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे याचा विश्वास देते, असे सौ. देशमुख म्हणाल्या. माझ्या चार शब्दांनी जर कोणाची उमेद वाढत असेल, त्यांचा एकटेपणा दूर होत असेल तर या संकटकाळात पोलिसांच्या कुटुंबाला धीर देणे ही मला माझी जबाबदारी वाटते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. सुमारे सव्वादोन लाख मनुष्यबळ असलेल्या पोलिस दलाचा कुटूंबप्रमुख म्हणून त्यांना धीर देणे माझे कर्तव्य असल्याची त्यांची भावना आहे. देशमुख यांच्या 'होम मिनिस्टर' देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पोलिसांच्या 'घरा'ची काळजी घेत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com