महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना दिल्या 'या' सूचना

प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका आहे. त्यामुळे जे राष्ट्रीय प्रश्‍न आहेत त्यावर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमधे चर्चा होत असून, महाविकास आघाडी सरकार म्हणून किमान समान कार्यक्रमावरच लक्ष केंद्रीत करा अशा सूचना तिन्ही पक्षांच्या आमदारांना बैठकीत देण्यात आल्या आहेत
Mahavikas Aghadi Instructs MLAs to Avoid Disputed Statements
Mahavikas Aghadi Instructs MLAs to Avoid Disputed Statements

मुंबई : प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका आहे. त्यामुळे जे राष्ट्रीय प्रश्‍न आहेत त्यावर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमधे चर्चा होत असून, महाविकास आघाडी सरकार म्हणून किमान समान कार्यक्रमावरच लक्ष केंद्रीत करा. सरकारच्या निर्णयाचा व धोरणांचा अभ्यास करून ते विधीमंडळात प्रभावीपणे मांडताना तिन्ही पक्षाच्या आमदार व नेत्यांनी एकोप्याने विरोधकांचा सामना करावा, असा निर्धार महाविकास आघाडी सरकारच्या संयुक्‍त बैठकीत व्यक्‍त करण्यात आला. विधानभवन मधे आज शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्‍त बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

सध्या सीसीए, एनआरसी व एनपीआर च्या मुद्‌द्‌यावरून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्‍नावर अकारण आक्रमक होण्याचा विरोधकांचा मानस आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत वादग्रस्त वक्‍तव्य टाळावीत. जे राष्ट्रीय मुद्‌दे आहेत त्यावर तिन्ही पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमधे चर्चा होत असतात. राज्य विधीमंडळात त्यावर चर्चा करण्याची आवश्‍यकता नाही. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी आमदारांच्या समोर स्पष्ट केले.

प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने त्यांना ती सांभाळण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र, आपले सरकार या विचारधारांवर एकत्र आले नसून किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील बाबींवरच तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी व आमदारांनी लक्ष केंद्रीत करावे. असे ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय प्रश्‍नांसदर्भात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी मी स्वत: चर्चा केली असून यापुढेही तीन्ही पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत अशा विषयांवर चर्चा करून तोडगा काढला जाईल. मात्र, त्याचे पडसाद राज्यातील सरकारच्या कामकांजावर पडणार नाही. याची दक्षता घ्यावी असे उध्दव ठाकरे म्हणाले.

विरोधकांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थिती कायम ठेवावी आणि प्रभावी मांडणी करत विरोधकांना उत्तर द्‌यावे. असे अजित पवार यांनी सांगितले. तर, या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा अभ्यासून त्यावर आमदार व नेत्यांनी अधिकात अधिक भाष्य करावे. असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
आगामी अर्थसंकल्प हा महाविकास आघाडी सरकारचा चेहरा असून अर्थसंकल्पातील योजनां सामान्य नागरीकांच्या पर्यंत पोहचतील यासाठी सर्वच आमदार व नेत्यांनी आतापासूनच तयारी करावी. अशा सूचनाही यावेळी तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्‍त केल्या.

काय ठरले बैठकीत

. राष्ट्रीय प्रश्‍नावर राष्ट्रीय स्तरावरच चर्चा
. महाविकास आघाडीच्या आमदारांनी गैरहजर राहू नये
. सरकारच्या योजनांची प्रभावी मांडणी करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com