उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते, पण शरद पवारांनी…

उद्धव साहेब (Uddhav Thackeray) अनेकदा आमच्याजवळ बोलले होते की, मला मुख्यमंत्रिपदामध्ये रस नाही आणि त्यामुळे मी कधी निवडणुकही लढलो नाही.
Uddhav Thackeray, MP Krupal Tumane and Sharad Pawar
Uddhav Thackeray, MP Krupal Tumane and Sharad PawarSarkarnama

नागपूर : हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही भाजपसोबत निवडणूक लढलो होतो आणि आता आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. आम्ही फक्त गटनेता बदलविला बाकी सर्व शिवसेनेतच आहोत. शिवसेनेची सर्व कार्यकारिणी येथे आलेली आहे. हे तर मला माहितीसुद्धा नव्हते, पण विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्व जण मला येथे भेटले. भविष्यातही आम्ही शिवसेनेला पुढे नेण्यासाठी काम करू, असे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) म्हणाले.

दिल्लीहून परतल्यानंतर येथील विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर (Nagpur) शहर व जिल्ह्यातील काही महत्वाचे पदाधिकारी तुमच्यासोबत दिसत नाहीये, असे विचारले असता ते येथे दिसत नसले तरीही माझ्याप्रमाणे तेसुद्धा शिवसेनेतच (Shivsena) आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर पुढे जाणारे लोक, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे आणि त्या त्या सरकारमधील लोकांचा या विचारधारेला सतत विरोध असायचा. त्यामुळे आमच्यात नाराजी होतीच. आतंकवाद्यांशी संबंध असलेले नवाब मलिसांसारखे (Nawab Malik) लोक मंत्रिमंडळात होते. त्यामुळे आम्ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहुच शकत नव्हतो. तेथे आमची घुसमट होत होती आणि ही बाब आम्ही वेळोवेळी श्रेष्ठींना सांगितलीदेखील होती. पण त्यावर काहीही विचार न झाल्यामुळे आम्हाला हिंदुत्वासाठी ही भूमिका घ्यावी लागली, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंना पाच वेळा भेटलो..

२० जूननंतर राज्यात जी काही परिस्थिती उद्भवली, त्या काळात आम्ही उद्धव ठाकरेंना भेट होतो. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही संपर्कात होतो. या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी आम्हा सर्व खासदारांची इच्छा होती. त्या दरम्यान आम्ही उद्धव ठाकरेंना तब्बल पाच वेळा भेटलो. प्रत्येक वेळी काही तरी मार्ग निघेल या अपेक्षेने आम्ही पुढे जात होतो. आताही सर्व खासदार त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

एकनाथ शिंदेंची सुरक्षा वाढवायलाच पाहिजे होती..

सरकारमधील मंत्र्यांना किंवा कुणालाही जिवे मारण्याची धमकी मिळाली, तर त्यांना सुरक्षा दिली पाहिजे किंवा असलेली सुरक्षा वाढविली पाहिजे. एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यायला पाहिजे होती. तेव्हा सरकारने एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवली नाही, ही त्याची चूक होती, असे खासदार तुमाने म्हणाले.

१२ चे १५ लवकरच होतील..

आमच्या गटात सध्या १२ आमदार आहेत, ते लवकरच १५ होतील आणि पुन्हा वाढतील. आम्हाला गटनेता बदलवायचा होता. कारण विनायक राऊतांपासून आम्हाला प्रचंड त्रास होता. सभागृहामध्ये जेव्हा कोणत्याही बिलावर बोलण्याची वेळ यायची, तेव्हा विनायक राऊत आमची नावे पाठवून द्यायचे आणि जेव्हा आमची बोलायची वेळ यायची, जेव्हा आम्हा बोलायचे असायचे. तेव्हा स्पिकर दुसऱ्यांचेच नाव जाहीर करायचे. त्यामुळे आम्हाला कळतच नव्हते. कारण बोलायच्या वेळी एक तर ते स्वतः किंवा अरविंद सावंत दोघेच बोलायचे. इतरांना बोलण्याची संधीच मिळत नव्हती. पार्लामेंटचा रेकॉर्ड काढून बघितला तर ही गोष्ट लक्षात येईल, असेही खासदार तुमाने यांनी सांगितले.

Uddhav Thackeray, MP Krupal Tumane and Sharad Pawar
Shivsena: शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार ; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

पार्लामेंट्री कमिटीच्या बुधवारच्या बैठकीत कोण कोण केव्हा केव्हा बोलणार यावर चर्चा होऊन ठरविले जायचे. पण प्रत्यक्षात सभागृहात मात्र विनायक राऊत आणि अरविंद सावंत हेच बोलायचे. हा इतर सर्व खासदारांवर मोठा अन्याय होत होता. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता आणि नंतर नंतर तर बुधवारची बैठक घेणेही त्यांनी बंद केले होते. त्यामुळे सर्व खासदारांचा विनायक राऊतांवर रोष होता. त्यांना हटवण्याची कारवाई मागच्या अधिवेशनातच होणार होती. पण झाली नाही. त्यामुळे आम्ही आता त्यांना गटनेते पदावरून हटवले आहे, असे ते म्हणाले.

शरद पवारांनी त्यांना कारणे सांगितली...

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडलं. उद्धव साहेब अनेकदा आमच्याजवळ बोलले होते की, मला मुख्यमंत्रिपदामध्ये रस नाही आणि त्यामुळे मी कधी निवडणुकही लढलो नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच आमदारकीचाही राजीनामा दिला. आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. आमचे ४० आमदार आणि आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना सांगायचो की, महाविकास आघाडीतून बाहेर पडा. पण ते तसे करतच नव्हते. एका माणसासाठी त्यांनी पक्ष पणाला लावला. आज काय स्थिती आहे, हे सर्व जण बघतच आहेत. आताही ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले, तर चित्र बदलू शकते, असेही खासदार तुमाने यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com