आता सोयाबीनवर स्टॉक लिमीट असणार नाही, तुपकर-पवार चर्चा यशस्वी…

ज्या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं कृषी विभाग त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी सांगितले.
Ajit Pawar and Ravikant Tupkar
Ajit Pawar and Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : दोन दिवसांपूर्वी ठरल्याप्रमाणे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री, विदर्भातील सर्व मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. सकारात्मक चर्चा होऊन ही बैठक यशस्वी झाली आहे. मुख्य मागण्यांपैकी सोयाबीनसाठी स्टॉक लिमीट आता असणार नाहीये.

मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंत्रिगण, संबंधित अधिकारी आणि तुपकरांची दीड तास चर्चा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांमध्ये सोयाबीनसाठी स्टॉक लिमीट असू नये, ही प्रमुख मागणी होती, ती पूर्ण झाली. आज झालेल्या चर्चेमध्ये खाद्य तेल, तेलबियांच्या स्टॉकवर राज्य सरकार मर्यादा लावणार नाही. जे अनुदान मिळालं नाही, ते बँकांनी शेतकऱ्यांना द्यावे, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्यांना निधी मिळणार आहे. दोन लाखापेक्षा जास्त कर्ज ज्यांच्यावर आहे, त्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. ज्या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं कृषी विभाग त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ही बैठक झाल्यावर माध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले, राज्य सरकारने आज काही महत्वाचे निर्णय घेतले. आमची जी महत्वाची मागणी होती, ती पूर्ण झाली. त्यामुळे आता व्यापारी सोयाबीनच्या खरेदीसाठी पुढे येतील आणि सोयाबीनला चांगला भाव मिळेल. अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. बॅंका ते पैसे वापरत आहेत. ते पैसे एका आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना देण्याचे आदेश अजित पवारांनी दिले. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात नसल्यामुळे ते एनपीए होत होते आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नव्हते.

Ajit Pawar and Ravikant Tupkar
आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर

आज बैठकीत झालेल्या निर्णयानुसार फेब्रुवारी महिन्याअखेर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आणि महात्मा जोतिबा फुले योजना, या दोन्ही योजनांअंतर्गत जेवढे शेतकरी पात्र आहेत, त्यांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याअखेर पैसे जमा होतील. दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या बाबतीतही आम्ही सकारात्मक आहोत. एकदा मागची सर्व कर्जमाफीची प्रकरणे निकाली काढली की हे कर्ज माफ करण्याची घोषणा करू, असाही निर्णय आजच्या बैठकीत झाला. पीक विम्याच्या प्रश्‍नावर साधकबाधक चर्चा झाली. इतर अनेक बारीकसारीक विषयांवरही सविस्तर चर्चा झाल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com