बंडखोरीच्या वादळाची सोशल मीडियावर चकमक; ईर्षा, द्वेषाचा भडका !

सोशल मिडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सेनेमध्ये चकमक उडत आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama

नागपूर : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण ढवळून निघाले. आधी सुरत (Surat) आणि त्यानंतर आसामच्या गुवाहाटीमध्ये त्यांना आपल्या आमदारांसह मुक्काम ठोकला. तेव्हापासून सोशल मिडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना आणि (Eknath Shinde) शिंदेंच्या सेनेमध्ये चकमक उडत आहे.

राज्याच्या राजकारणात निर्माण झालेले वादळ सोशल मीडियाच्या माध्यमातून हातात मोबाईल असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचले. २१ जूनपासून कधी नव्हे एवढा ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर या वादळात सापडलेल्या नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे. यातून निर्माण झालेल्या राजकीय स्थितीवर नियंत्रणाऐवजी ईर्षा, द्वेषाचा भडका उडत असल्याचे चित्र असून प्रत्यक्ष संवादाचा अभाव कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर घराघरांत वाढला. त्यातून कुटुंबातही एकलकोंडेपणा वाढला. एकमेकांना गृहीत धरण्यासारखे प्रकार वाढले. त्याचे परिणाम कुटुंबातील प्रत्येकच सदस्याला सोसावे लागत आहे. तीच स्थिती आज राज्याच्या राजकारणात दिसत असल्याचे मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले. गेली अनेक दशके एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून निष्ठेने काम करणारे आज सत्तेसाठी लढताना दिसत आहे. २१ जूननंतर या नेत्यांनी सोशल मीडियातूनच एकमेकांवर आरोप सुरू केले.

बंडखोर एकनाथ शिंदे यांनी गेल्या सहा दिवसांत पंचवीस ट्विट केल्याचे दिसून येते. दोन दिवस मवाळ असलेले शिवसेनेचे नेतेही नंतर चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप, प्रत्युत्तर देण्याची मालिकाच सुरू झाली असून ती आजही कायम आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वतः गेल्या सहा दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत फारच कमी सहा ते सात ट्विट केले. परंतु त्यांनी शिवसेनेला अनुकूल अनेक ट्विट रिट्विट केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळेला सोशल मीडियाचा मोठा वापर राजकीय नेत्यांकडून केला जात होता. परंतु, गेल्या सहा दिवसांत सोशल मीडियातूनच पत्र जाहीर करणे, बंडखोर आमदारांकडून त्यांचे मत असलेले व्हिडिओ अपलोड करून आपल्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविल्या जात आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
पुण्यात शिवसेनेला धक्का : कट्टर पदाधिकाऱ्याने धरली एकनाथ शिंदे गटाची वाट!

उत्साहाच्या भरात नको ते वक्तव्य पोस्ट केल्याने शिवसैनिकही संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन बोलण्याचे आवाहन बंडखोरांना केले होते. या काळात मुख्यमंत्र्यांनी मात्र, सोशल मीडियावर संयम बाळगल्याचे दिसून येते. त्यांचे ट्विट बघितल्यास केवळ सरकारचे निर्णय, जयंती आदीचेच दिसून येत आहे. एकूण संवाद नसल्याने सोशल मीडियावर राजकीय चकमक दिसून येत असल्याचे पारसे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष संवाद, चर्चेतूनच कुठल्याही समस्येवर तोडगा शक्य आहे. परंतु, आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात आहोत, असे गृहीत धरून प्रत्यक्ष संवाद टाळला जातो. त्यातूनच निर्माण झालेली दरी मग कुटुंब असो की राजकीय पक्ष उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरते. सोशल मीडियाचा निश्चितच मोठा लाभ होतो. ते संवादाचे माध्यमही आहे. परंतु प्रत्यक्ष संवाद अधिक परिणामकारक ठरतो.

- अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com