नागपूर : मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटतेय, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते काल म्हणाले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की, आजही जनता त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते, जेवढे ते मुख्यमंत्री असताना करत होते.
आजही जनतेचे तेवढेच प्रेम आपल्यावर असल्याचे त्यांना विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यात जाणवले. लोक त्यांना म्हणाले की, साहेब तुम्ही मुख्यमंत्री असायला हवे होता. त्यामुळे त्यांना आजही असं वाटतं की मुख्यमंत्री आहेच. कारण लोकांना उद्धव ठाकरे यांच्याकडून कसल्याही अपेक्षा आता राहिल्या नाहीत. साहजिकच त्या अपेक्षा लोकांना फडणवीसांकडून आहेत. कारण सरकारमधील कुणीही आज फिल्डमध्ये उतरले नाही. जिवाचा आकांत करून फडणवीसच आज फिल्डमध्ये आहे. महाराष्ट्राची जनता हे सर्व बघते आहे, असे पाटील म्हणाले. लोकांनी तर त्यांना येथपर्यंत सांगितले की, तुम्ही मुख्यमंत्री असताना आम्ही सारखे बॅंकेच्या रांगेतच उभे असायचो. कधी तुम्ही आम्हाला अतिवृष्टीचे अनुदान द्यायचे, कधी विम्याची रक्कम द्यायचे. ही लोकांची भावना आहे, त्याला कुणी रोखू शकणार नाही.
माजी मंत्री म्हणू नका
मी देहू नावाच्या एका छोट्या गावामध्ये एका तरुणाला सलून उभं करून दिलं. त्याच्या उद्घाटनासाठी मी तेथे गेलो होतो. त्यावेळेला माझ्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब भेगडे होते आणि ग्रामीण भागात एक पद्धत आहे की, पाहुणे आले की लगेच माईकवरून घोषणा केल्या जातात. त्यावेळी एक जण माईकवरून ओरडत होता की, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे आलेत… माजी मंत्री बाळासाहेब भेगडे आलेत… त्यावेळी मी त्याला म्हटल की, माजी काय म्हणतो, आजी मंत्री म्हण. पण त्यानंतर लगेच त्याची स्टोरी झाली. मी तसं काही म्हटलं नव्हतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमची संघटना लोकशाही तत्वावर चालते..
आमची कोअर कमिटी, संघटना ही लोकशाही तत्वावर चालते. त्यामुळे समूहाने निर्णय घेण्याची आमचा कार्यपद्धती आहे. दर महिन्याला आमची बैठक असते. कालची बैठकही नियमित होती, या बैठकीला आमचे प्रभारी आले होते. त्यामुळे ती जरा जास्त वेळ चालली येवढेच. बाकी पवारांच्या बैठकीत काय झाले याबद्दल मला काहीही माहिती नाही, असे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीवर पदयात्रा काढण्याची वेळ का आली?
सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अशीही वेळ आली की त्यांना जनसंपर्क यात्रा काढावी लागली. सत्ताधारी पक्ष यात्रा काढून सांगणार काय आहेत की, शेतकरी बंधूंनो आम्ही तुमची कर्जमाफी केली नाही. आता बरं वाटतय ना… तुम्हाला विमा मिळाला नाही, बरं वाटतंय का… कोविडमध्ये तुम्हाला मदत केली नाही, कसे वाटते, हे विचारण्यासाठी ही यात्रा आहे का, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.